Imtiyaz Jaleel Sarkarnama
मराठवाडा

Imtiyaz Jaleel : मुलगा आंदोलकांना चिथावणी देतो; वडील शांततेच आवाहन करतात! शाहू महाराजांच्या कोल्हापुरात हे योग्य आहे का ?

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी झालेल्या आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले आहे. एमआयएमने विशाळगडावरील मशिदीची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ एमआयएमने शुक्रवारी (ता. 19) कोल्हापूरसह राज्यभरात निदर्शने आणि आंदोलनाची हाक दिली आहे.

माजी खासदार प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी अतिक्रमण एक निमित्त आहे. यामागे मोठे षडयंत्र आणि घाणेरडे राजकारण असल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती व खासदार शाहूराजे छत्रपती यांच्यावर टीका केली आहे.

या आंदोलनानवरून इम्तियाज जलील यांनी खडा सवाल उपस्थित केला आहे. मुलगा विशाळगडावर मुस्लिम कुटुंबावर हल्ला करणाऱ्यांचे नेतृत्व करतो, तर वडील दोन दिवसांनी तिथे जाऊन शांततेच आवाहन करतात. हे कितपत योग्य आहे? या घटनेला कोण जबाबदार आहे की नाही? पोलिस अधिक्षक घटनेला जबाबदार असतील तर त्यांना निलंबित करा, जिल्हाधिकारी दोषी असतील तर त्यांना बडतर्फ करा, अशा शब्दांत जलील यांनी आपला संताप व्यक्त केला.

एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदोद्दीन ओवैसी Asaduddin Owaisi यांनी विशाळगडावरील मशिदीवर झालेला हल्ला म्हणजे दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले होते. तर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल आम्हाला आता आदर राहिला नाही, अशी टीका त्यांनी केली होती.

आता उद्या राज्यभरात एमआयएमच्या वतीने विशाळगड मशीद तोडफोड प्रकरणी निदर्शने करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एमआयएमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आवाहन करताना इम्तियाज यांनी संभाजीराजे छत्रपती, शाहूराजे छत्रपती यांच्यावर आरोप केले.

या राज्यातील नेते पुरोगामी महाराष्ट्राचा दाखला देत हे राज्य शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे असल्याचे सांगतात. आपल्या भाषणातून सातत्याने याचा उल्लेख करतात. मग विशाळगडावर अतिक्रमणाच्या नावाखाली जे घडले ते योग्य आहे का? शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये अशा प्रकारे गोर-गरीबांच्या घरात घुसून त्यांना मारहाण करणे, त्यांची घरे तोडणे, मशिदीवर हल्ला चढवणे ही या राज्याची परंपरा आहे का? एक मुलगा म्हणजे संभाजीराजे छत्रपती हल्लेखोरांचे नेतृत्व करतात, तर दोन दिवसांनी त्यांचे वडील खासदार शाहूराजे छत्रपती तिथे जाऊन शांततेच आवाहन करतात, याकडेही जलील Imtiyaz Jaleel यांनी लक्ष वेधले.

तुम्हाला खरंच हे सगळं रोखायचे होते, तर घटना घडली त्याच दिवशी तुम्ही रस्त्यावर का उतरला नाहीत? अतिक्रमण केवळ निमित्त आहे. राज्यात या माध्यमातून एक मोठा डाव आणि घाणेरडे राजकारण केले जात आहे, असा आरोपही इम्तियाज जलील यांनी केला. उद्या राज्यभरात होणाऱ्या निदर्शनाकडे राजकारण म्हणून पाहू नका. मशिदीवर झालेला हल्ला योग्य आहे का? याचा विचार करून सगळ्यांनी या घटनेच्या विरोधात रस्त्यावर उतरून आवाज उठवा, असे आवाहन जलील यांनी केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT