Rally in Marathwada Sarkarnama
मराठवाडा

Rally of Political Parties in Marathwada : पावसाने पाठ फिरवली, पण मराठवाड्यात आजी-माजी मुख्यमंत्र्यांसह अजित पवारांकडून घोषणांचा पाऊस पडणार ?

Marathwada Rally news : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि बीड या तीन जिल्ह्यात उद्या राज्याचे आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या सभा

सरकारनामा ब्यूरो

Aurangabad Political News : पावसाने पाठ फिरवली, पेरणी वाया जाण्याच्या मार्गावर आहे, ऐन पावसळ्यात टँकरने पिण्याची पाणी आणण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत राजकीय नेत्यांची भाषण आणि सभा मात्र जोरात सुरु आहेत. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि बीड या तीन जिल्ह्यात उद्या राज्याचे आजी-माजी मुख्यमंत्री आणि नव्यानेच सरकारमध्ये सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार घोषणा आणि आश्वासनांचा मोठा पाऊस पाडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्र आणि राज्याच्या योजनांचा सर्वसामान्यांना कसा लाभ होत आहे, हे सांगण्यासाठी परभणीत 'शासन आपल्या दारी'च्या कार्यक्रमातून आपली पाठ थोपटवून घेणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडमध्ये काकांनी घेतलेल्या स्वाभिमान सभेला उत्तर सभेतून जोर दाखवणार आहेत.

राजकीय अस्तित्वाच्या या लढाईत राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील मागे नाहीत. हिंगोलीमध्ये निर्धार सभा घेत ते सोडून गेलेल्या आमदार, खासदारांवर टीकेचे बाण सोडणार आहेत. एकाच दिवशी म्हणजे उद्या, २७ रोजी होणाऱ्या या तीन्ही कार्यक्रमांकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

`शासन आपल्या दारी`, हा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम. यावर कोट्यावधी रुपये खर्च होत असल्याने यातून सर्वसमान्यांची कामे किती होतात? असा प्रश्न देखील उपस्थितीत केला जात आहे. विरोधकांनी या कार्यक्रमाला केवळ दिखावा असल्याचे म्हणत टीका केली असली तरी सत्ताधारी त्याला फार महत्व देतांना दिसत नाहीत. आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये `शासन आपल्या दारी`, घेऊन जात आहे. राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी संकटात असतांना अशा कार्यक्रमांची खरचं गरज आहे का? असा प्रश्न देखील या निमित्ताने विचारला जात आहे.

एकीकडे शासकीय कार्यक्रम तर दुसरीकडे राजकीय सभा यामुळे सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघत आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार, अजित पवार हे दोन्ही नेते राज्यभरात सभा आणि उत्तर सभा घेऊन शक्तीप्रदर्शन करतांना दिसत आहेत. या सभांवर देखील लाखो रुपयांची उधळण केली जात आहे. अशीच काहीशी स्थिती पक्ष फुटलेल्या शिवसेनेची देखील झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आता बोहर पडत पक्षातून फुटून गेलेल्या आमदार, खासदारांच्या मतदारसंघामध्ये निर्धार सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची पहिली निर्धार सभा देखील उद्याच हिंगोलीच्या रामलीला मैदानावर होत आहे. या सभेतून ते गद्दारांवर तुटूनही पडतील पण या आजी - माजी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या सभा, कार्यक्रमांमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला काही दिलासा मिळणार आहे का? हा खरा प्रश्न आहे.

Edited By : Jagdish Pansare

SCROLL FOR NEXT