Sharad Pawar, Devendra Fadnavis, Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : शरद पवार सत्तेत आहेत का? जरांगे पाटलांचा फडणवीसांना सवाल, नेमकं प्रकरण काय?

Jagdish Patil

Jalna News, 17 July : ओबीसी नेते मराठा समाजाच्या अंगावर घालण्याचा देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) डाव असल्याचा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. शिवाय सतत शरद पवारांचं नाव का घेता? ते कुठे सत्तेत आहेत? असा प्रश्नही जरांगे यांनी फडणवीसांना विचारला आहे.

एकीकडे महायुती सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांची यांची भेट घेतल्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, ही भेट आपण आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी घेतल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.

तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्यात 25 जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा केली आहे. या सर्व घडामोडींवर जरांगे पाटील यांनी भाष्य केलं आहे. राज्य सरकारला दिलेली 1 महिन्यानची मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सरकारला दिलेली मुदत संपल्यामुळे 20 जुलैपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याचं जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी यावेळी सांगितलं. तसंच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे म्हणाले, "सरकारला एक महिन्याचा वेळ दिला होता. आता 20 जुलैला आमरण उपोषण करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे, ते उपोषण कठोर करणार आहे.

मराठा (Maratha) समाजाला गोड गोड बोलायचं हा फडणवीस साहेबांचा दुसरा डाव दिसतो. ओबीसी नेते मराठा समाजाच्या अंगावर घालायचे. फडणवीस यांनी इतके छिचोरे चाळे का करायला पहिजे, एवढ्या मोठ्या नेत्यांनी महाविकास आघाडीची आणि महायुतीची बैठक लावली होती. तेव्हापासून सगळे विरोधात बोलायला लागले आहेत. तुम्ही नेमकी तोडगा काढायला बैठक बोलवली होती की, मराठ्यांविषयी प्रत्येकाला द्वेष ओकायला लावण्यासाठी?" असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

फडणवीसांना राज्य रक्तबंभाळ करायचं आहे का?

शिवाय फडणवीस साहेबांना राज्य रक्तबंभाळ करायचं आहे का? असा प्रश्न विचारत, नेमकं तुमचं काय चाललंय हेच कळत नाही. आमच्या सगेसोयऱ्यांना, मराठ्यांना त्रास द्यायचा. म्हणजे तुम्ही आमच्या सगेसोयऱ्यांना त्रास देणार, मात्र, तुमचे पण सोयरे आहेत, असा इशारा जरांगे यांनी फडणवीसांना दिला.

शरद पवार कुठे सत्तेत आहेत?

तसंच यावेळी त्यांनी शरद पवारांवरूनही फडणवीसांवर टीका केली. ते म्हणाले, "भाजपचा एवढा मोठा उच्च दर्जाचा नेता मराठ्यांविषयी डाव करतोय, मला तर फडणवीसांचं आश्चर्य वाटायला लागल आहे. बार बार एकच शब्द काढायचा, शरद पवारांनी काही दिलं नाही, त्यांच्याकडे मोर्चा वळवा. पण आता ते कुठे सत्तेत आहेत?

साष्ट पिंपळगावच्या आंदोलनावेळी त्यांच्याकडेच मोर्चा होता आमचा. दोन टप्प्यात, दोन भूमिकेत वागणाऱ्या अवलादी आमच्या नाहीत. सत्तेत तुम्ही आहात, त्यांनी काय नुकसान केलं आम्हाला माहीती आहे. पण त्यांनी नुकसान केलं म्हणून तुम्हाला पण करायचंय आहे का आता?" अशा शब्दात जरांगे यांनी फडणवीसांवर सडकून टीका केली.

तसेच फडणवीस साहेब तुमचं काय चाललंय मला काही कळत नाही आणि पुन्हा म्हणता मला टार्गेट केलं जातं. पण तुम्ही वागताच तसे. कारण, तुमच्या बैठकीला आलेले नेते, आता मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत आहेत, असं म्हणत जरांगे यांनी फडणवीसांनी बोलवलेल्या बैठकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT