Raosaheb Danve-Arjun Khotkar-Abdul Sattar
Raosaheb Danve-Arjun Khotkar-Abdul Sattar Sarkarnama
मराठवाडा

Jalna : रावसाहेब दानवे म्हणाले, त्याने औरंगाबादचा `औरंगजेब` माझ्या मागे लावून दिला..

उमेश वाघमारे

जालना : पाण्यासाठी जल आक्रोश मोर्चा काढण्यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी आपले राजकीय विरोधक असलेले शिवसेनेचे अर्जून खोतकर आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर टीका केली. त्याने म्हणजे अर्जून खोतकर यांनी आपल्या मागे औरंगाबादचा औरंगजेब म्हणजे अब्दुल सत्तार यांना माझ्या मागे लावून दिले आहे, असा टोला लगावला आहे.

जल आक्रोश मोर्चाच्या आधी पत्रकारांशी बोलतांना दानवे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत प्रश्नांना उत्तरे दिली. (Jalna) समोर टीका करण्याची हिमंत नाही म्हणून त्याने माझ्या मागे औरंगाबादचा औरंगजेब लावून दिला असल्याचे दानवे म्हणाले. रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार हे एकमेकांचे विरोधक असल्याचे दाखवतात, पडद्यामागे मात्र या दोघांची मिलीभगत असल्याची चर्चा नेहमीच होत असते.

राज्यसभा निवडणुकीच्या दरम्यान, सत्तार यांनी भोकरदन-जाफ्राबादचे भाजप आमदार संतोष दानवे यांचे मत आपण फोडणार असून ते महाविकास आघाडीला मतं देणार असल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात महाविकास आघाडीचा दुसरा उमेदवार पराभूत झाला आणि भाजपचा तिसरा उमेदवार निवडून आला. त्यानंतर संतोष दानवे यांनी सत्तार यांच्यावर निशाणा साधत त्यांनीच अपक्षांची मते भाजपला मिळवून दिल्याचा आरोप केला.

एवढेच नाही तर २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत देखील ते भाजपला मदत करणार असल्याचा दावा केला. हा कलगितुरा एकीकडे रंगत असतांनाच आता रावसाहेब दानवे यांनी देखील सत्तार यांचा उल्लेख औरंगाबादचा औरंगजेब असा करत खळबळ उडवून दिली आहे. औंरगजेबाच्या नावाने सध्या सगळ्याच पक्षात राजकारण सुरू आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीपासून अर्जून खोतकर आणि अब्दुल सत्तार ही जोडी रावसाहेब दानवे यांच्या मागे लागली आहे. संधी मिळेल तेव्हा हे दोघे त्यांच्यावर टीका करतात. पत्रकार परिषदेत हाच संदर्भ देत रावसाहेब दानवे यांनी खोतकर आणि सत्तार यांच्यावर निशाणा साधला. दानवे म्हणाले, समोरा समोर टीका करण्याची हिम्मत नसल्याने त्याने औरंगाबादचा औरंगजेब माझ्या मागे टीका करण्यासाठी लावून दिला आहे.

राज्यात भाजपाची सत्ता असताना जालना शहरातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्था करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. मात्र, अद्यापि हे काम पूर्ण झाले नसून या निधीचा हिशोब सत्ताधाऱ्यांनी द्यावा. मी माझ्या मंत्री पदाच्या कार्यकाळात जालन्यासाठी काय काम केले याचे फलक लावू शकतो.

मात्र, काही जण मंत्री असताना त्यांनी पाच वर्षात जालन्यासाठी केलेल्या पाच कामाची यादी जाहीर करावी. परंतु समोर टीका करण्याची हिंमत नसल्याने माझ्यावर टीका करण्यासाठी त्याने औरंगाबादचा औरंगजेब माझ्या मागे लावून दिला आहे. निवडणूक आल्यानंतर या दोघांनाही मी खिशात घालतो, असा दावा देखील दानवे यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT