Sharad Pawar, Jayant Patil
Sharad Pawar, Jayant Patil Sarkaranama
मराठवाडा

Jayant Patil News : जयंत पाटलांचा कॉन्फिडन्स वाढला; म्हणाले, लोकसभेपेक्षा 'मविआ'ला विधानसभेला मोठं यश मिळणार

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने असली कोण आणि नकली कोण? याचा फैसला केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या बाबतीत लोकांचा कौल मिळाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी पक्षात सरसकट बाहेर गेलेल्यांना प्रवेश दिला जाणार नाही. ज्यांच्यामुळे पक्षाला यातना झाल्या ते आम्ही कधी विसरणार नाही. एखाद्या नेत्याचा पक्षाला किती फायदा होईल, याचा निश्चित विचार केला जाईल, त्यानंतरच पक्षात कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही? हे ठरवू असेही पाटील यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असलेल्या जंयत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना राज्यातील राजकीय परिस्थिती, महाविकास आघाडीचे जागा वाटप आदी विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षाकडून फक्त घोषणांचा पाऊस पाडला जाईल. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला नाकारले आहे, त्यामुळे झालेले हे नुकसान भरून काढण्यासाठी खोटी आश्वासने, योजनांच्या घोषणा सरकारकडून केल्या जातील. प्रत्यक्षात दीड-दोन महिन्याच्या काळात त्या पुर्ण करणे किंवा मार्गी लावणेही सरकारला शक्य होणार नाही.

उलट विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर त्यांच्यापेक्षा चांगल्या आणि जनतेच्या हिताच्या योजना आम्ही राबवू, असा दावा जयंत पाटील यांनी केला. 20 ऑक्टोबर पर्यंत विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील, त्याआधी 20 सप्टेंबरला आचारसंहिता जाहीर होऊ शकते. तर 20 ऑगस्टला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, असे सांगत जयंत पाटील यांनी निवडणूक कार्यक्रमच सांगितला.

सरकारकडून त्यामुळे आता फक्त घोषणांचा पाऊस पाडला जाईल. सध्या आपले आमदार सांभाळण्यात सरकार व्यस्त आहे, प्रत्येक आमदारांना कोट्यावधीचा निधी देण्याच्या घोषणा केल्या जात आहेत. आमदारही मी इतक्या कोटीचा निधा आणला असे सांगत कामाच्या उद्घाटनाचे नारळ, फोडून टक्केवारीचा हिशोब करत असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

सध्या फक्त निधीच्या घोषणा आणि कंत्राटाचे वाटप हा एकच उद्योग सरकारी पातळीवर सुरू आहे. या सगळ्या निधी आणि कामांची एकत्रित यादी केली तर त्यासाठी पैसे द्यायला तीन वर्ष लागतील, असा चिमटाही पाटील यांनी काढला.

महाविकास आघाडी समन्वयाने पुढे जाणार..

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अद्याप जागा वाटपाची चर्चा अगदीच प्राथमिक पातळीवर आहे. लवकरच या संदर्भात तीनही पक्षांची एकत्रित बैठक होऊन जागा वाटपावर ठोस चर्चा होईल. सध्या महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) तीनही पक्षांनी कुठेही वाद, गैरसमज निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे ठरवले आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार? हे राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? आणि तीनही पक्षांचे निवडून आलेले आमदार , प्रमुख नेते मिळून मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतील. त्यामुळे महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अमूक एखाद्या नेत्याचे भावी मुख्यमंत्री वगैरे असे पोस्टर लावू नये, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT