Dharashiv Councillors Disqualification Politics : खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरानंतर धाराशीव जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागली आहे. अनेक नगरसेवक, पदाधिकारी शिवसेना किंवा भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. धाराशीव-कळंबचे आमदार कैलास पाटील, स्थानिक नेते मकरंदराजे निंबाळकर यांनी बंडखोरांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
ओमराजे व त्यांच्यासोबत गेलेल्या नगरसेवकांवर खोके घेतल्याचा आरोप मकरंदराजे निंबाळकर यांनी काल केला होता. त्यानंतर आता कैलास पाटील यांनीही फुटून गेलेल्या नगरसेवकांना धडा शिकवण्यासाठी मोठे पाऊलं उचलण्याची तयारी चालवली आहे. मशाल चिन्हावर निवडून आल्यानंतर गद्दारी करत शिवसेनेत दाखल झालेल्या या नगरसेवकांवर पक्षांतर बंदी कायद्यानूसार कारवाईची मागणी कैलास पाटील हे जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही किंवा दाद दिली नाही तर थेट न्यायालयात धाव घेणार असल्याचे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले.
धाराशिवमध्ये पक्ष सोडून गेलेल्या १३ नगरसेवक ४ पंचायत समिती सदस्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याने या नगरसेवकांच्या गोटात घबराट पसरली आहे. मशाल चिन्हावर निवडून आलेले सदस्यांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागण्याची तयारी आमदार कैलास पाटील यांनी सुरू केली आहे.
जिल्हाधिकारी यांनी निर्णय न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही पाटील यांनी दिला आहे. या आक्रमक पावित्र्यामुळे पक्षांतर केलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कळंब येथील ९ तर धाराशिवच्या ४ नगरसेवकात खळबळ उडाली आहे.
दरम्यान नगरसेवकांनी बंडखोरी केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे गट आक्रमक झाला असून आमदार कैलास पाटील, पक्ष निरीक्षक यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. नगरसेवकांच्या गद्दारीबद्दल कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना अपात्र ठरवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबवली जावी, अशी एकमुखी मागणी या बैठकीत करण्यात आली.
कैलास पाटील म्हणाले, मी एवढंच सांगतो की, कळंबचे नगरसेवक असतील, धाराशिवचे पंचायत समिती सदस्य असतील किंवा धाराशिवचे नगरसेवक असतील, हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मशालीच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. कायद्यात ज्या तरतुदी आहेत, त्याप्रमाणे आम्ही वकिलांशी चर्चा करतोय. या तिन्ही ठिकाणी, जे आमचे नगरसेवक, पंचायत समिती सदस्य गेलेले आहेत, यांच्यावर कायदेशीर कारवाई वकिलांचा सल्ला घेऊन, निश्चितच करणार.
आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरुवातीला अपील दाखल करतोयं. जिल्हाधिकाऱ्यांकडून ती गोष्ट तीन महिन्यात निकाल लावून घेण्यासाठी, जर त्यांनी वेळ लावला, सत्तेत आहेत ती लोकं, अशा लोकांवर हे दबाव टाकतात, तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊन याला सुद्धा एक कालमर्यादा ठरवून देण्यासाठी उच्च न्यायालयाला विनंती करणार आहोत. वेळेत निकाल लावून यांच्यावर कायदेशीर कारवाई करून यांना अपात्र करण्याचा प्रयत्न करणार, आहोत असेही कैलास पाटील यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.