uddhav thackeray sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT : ठाकरेंच्या एकनिष्ठ आमदारासमोर मतदारसंघ राखण्याचे आव्हान!

Jagdish Pansare

ShivsenaUBT : नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगरात महायुतीचे संदीपान भुमरे विजयी झाले. शिवसेना शिंदे गटाने लोकसभेची जागा जिंकली आणि आता आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून सर्वाधिक आमदार निवडून आणण्याची तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेनेत बंड झाल्यानंतर जिल्ह्यातील कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदयसिंह राजपूत हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहिले.

जिल्ह्यातील ते एकमेव आमदार होते. इतर पैठण, सिल्लोड, वैजापूर, संभाजीनगर पश्चिम, मध्य अशा पाच मतदारसंघाचे आमदार शिंदेंसोबत गेले होते. उदयसिंह राजपूत हे सोबत न आल्याची सल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी कन्नड विधानसभा मतदारसंघही आपल्याकडे आला पाहिजे, असे आवाहन केले होते.

लोकसभा निवडणुकीत कन्नड-सोयगांव मतदारसंघातून संदीपान भुमरे यांना मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर शिंदे गटाचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. उदयसिंह राजपूत हे 25 वर्षाच्या संघर्षानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा विजयी झाले होते. पण अडीच वर्षात महाविकास आघाडी MVA सरकार सत्तेवरून पायउतार झाले आणि त्यानंतरच्या महायुती सरकारने कन्नड-सोयगांव विधानसभा मतदारसंघाला निधी देताना हात आखडता घेतल्याचा आरोप केला जातो.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उदयसिंह राजपूत Udaysingh Rajput यांनी जाहीरपणे मी शिंदे गटासोबत गेले नाही म्हणून माझ्यावर सडू उगवला जात आहे. माझ्या मतदारसंघात निधी दिला जात नाही. प्राधान्याने सांगितलेली कामे सोडून इतर कामांना मंजुरी दिली जात आहे, असे म्हणत विकास कामांची यादी असलेली फाईल सभागृहात भिरकावून दिली होती.

आगामी विधानसभा निवडणुकीत कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघ कायम राखण्याचे मोठे आव्हान उदयसिंह राजपूत यांच्यासमोर असणार आहे. लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढलेल्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना मतदारसंघात 45 हजार मते मिळाल्याचा दावा केला जात आहे. महायुतीच्या उमेदवारासह राजपूत यांना माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याशी मतदारसंघात दोन हात करावे लागणार आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राजपूत यांनी विकास कामांना वेग दिला होता. पण सत्तांतरानंतर तो मंदावला. राजपूत यांचा मतदारसंघात जनसंपर्क चांगला आहे. प्रत्येकाच्या चांगल्या-वाईट प्रसंगात मदतीला धावून जाण्यामुळे त्यांची मतदारसंघात प्रतिमा चांगली आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला मताधिक्य मिळाले ही त्यांच्यासाठी चिंतेची बाब असली तरी विधानसभेला चित्र वेगळे असू शकेल, असे बोलले जाते. ठाकरे गटाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली असली तरी यावेळी त्यांच्यासमोर आव्हान मोठे असेल असे दिसते.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT