Latur Politics : विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभारावरून सडकून टीका केली होती. देशमुख लबाड आहेत, बँकेच्या पैशातून त्यांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरले जाते, प्रामाणिकपणे निवडणूका होऊ दिल्या तर त्यांचे डिपाॅझीट जप्त करू, असा भडीमार निलंगेकरांनी केला. अमित देशमुख यांच्यावर केलेली ही टीका काँग्रेसच्या जिव्हारी लागली आहे. निलंगेकरांच्या या टीकेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी 'सीबीआयचे, 420 चे गुन्हे असणाऱ्यांनी गौरवशाली बँकेवर बोलू नये, असा पलटवार करत या वादात उडी घेतली आहे.
लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधीच आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी अमित देशमुख, धीरज देशमुख आणि त्यांचे काका दिलीपराव देशमुख यांच्याविरोधात आक्रमक पावित्रा घेतला आहे. जिल्हा बँकेची निवडणूक घ्यायची असेल तर आधी या बँकेने वाटप केलेल्या कर्जाची, एकूणच कारभाराची चौकशी लावा, बँकेवर प्रशासक नेमा आणि मग निवडणूका घ्या, अशी मागणी करत देशमुखांना आव्हान दिले. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या पुण्याईवर लातूरकरांनी अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्या नावाचा चेक तीन वेळा वटवला, चौथ्यांदा तो वटवू नका, असा टोला निलंगेकर यांनी लगावला.
आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार कार्यक्रमात निलंगेकर यांनी देशमुख कुटुंबाला लक्ष केल्यामुळे काँग्रेसमध्ये (Congress) संतापाचे वातावरण आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी निलंगेकर यांना डिवचले आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेले आरोप हे निव्वळ राजकीय नैराश्यातून आलेले आहेत. सध्या त्यांना कोणीही विचारत नसल्यामुळे केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी केलेली ती एक बाष्कळ बडबड आहे, अशी टीका साळुंके यांनी केली.
ज्येष्ठ नेते बसवराज पाटील यांच्या सत्कार समारंभात असे राजकीय आरोप करून कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा निलंगेकरांचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचेही साळुंके म्हणाले. संभाजी पाटील निलंगेकर सध्या अत्यंत नैराश्यात असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर तातडीने उपचाराची सोय करावी. सध्याच्या काळात त्यांना कोणीही विचारत नाही, त्यामुळे मोठ्या माणसांवर किंवा कर्तबगार लोकांवर बोलल्याशिवाय आपल्याकडे कोणी लक्ष देणार नाही, या मानसिकतेतून ते अशी विधाने करत आहेत. त्यामुळे त्यांच्या या बोलण्याला कोणीही गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
लातूर जिल्हा बँक ही एक आदर्श आणि शेतकऱ्यांची बँक आहे. गेल्या बारा वर्षांत तत्कालीन राज्य सरकारांनी आणि अगदी विद्यमान सरकारनेही या बँकेला अनेकदा गौरवान्वित केले आहे. बँकेच्या कारभाराविषयी आणि नियमबाह्य कामांविषयी जे आरोप केले जात आहेत, ते नियम खुद्द सरकारच्याच सहकार विभागाच्या नियमावलीनुसार ठरलेले आहेत. त्यामुळे जर काही आक्षेप असेलच, तर त्यांनी तो स्वतःच्या सरकारकडे जाऊन नोंदवावा, असे आव्हान साळुंके यांनी निलंगेकरांना दिले.
स्वतःवर सीबीआयचे (CBI) गुन्हे दाखल असलेल्या एका 420 आणि दिवाळखोर माणसाने एका आदर्श बँकेविषयी बोलणे अत्यंत हास्यास्पद आहे. त्यांच्याच सरकारने सीबीआयमार्फत त्यांच्यावर जिल्हा न्यायालयात गुन्हे दाखल केलेले आहेत. ते कागदोपत्री 420 चे गुन्हेगार असून भविष्यात त्यांची जागा जेलमध्ये असू शकते, त्यामुळे भाजपच्या इतर नेत्यांनी आणि सदस्यांनी आता त्यांच्यापासून सावध राहावे, असा इशाराही साळुंके यांनी दिला. ज्या व्यक्तीला बँकेबाबत बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, ती व्यक्ती केवळ राजकीय द्वेषातून आरोप करत असल्याचे सोळुंके म्हणाले.
बसवराज पाटील हे काँग्रेसचे जुने नेते होते आणि त्यांना काँग्रेसने दोनदा नेतृत्वाची संधी दिली होती. सत्कार समारंभात जाऊन असे राजकारण करणे हा कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रकार आहे. आपल्या भावाला उमेदवारी न मिळता ती बसवराज पाटील यांना दिली गेली, हे निलंगेकरांना पचवता आलेले नाही. त्या रागातून आणि कार्यक्रमाला गालबोट लावण्याच्या उद्देशानेच त्यांनी हे बेताल वक्तव्य केल्याचा आरोप अभय साळुंके यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.