Dilip Deshmukh, Suresh Dhas, Baburao Adaskar
Dilip Deshmukh, Suresh Dhas, Baburao Adaskar Sarkarnama
मराठवाडा

Vidhan Parishad Election News : लातूर-धाराशिव-बीड स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक टांगणीला; 'हे' आहे कारण

Dattatrya Deshmukh

Beed News : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुढच्या महिन्यात लातूर-धाराशिव-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची मुदत देखील संपत आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत दोन वर्षांपूर्वी संपली असून या ठिकाणी निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे मतदार नसल्याने ही निवडणूक लांबणीवर पडणार आहे.

या मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य व नगर पालिकेच्या नगरसेवकांना मतदानाचा अधिकार असतो. मात्र, या स्थानिक स्वराज्य संस्थवर आता प्रशासक राज आहे. या ठिकाणी निवडणुका झाल्या नसल्याने या संस्थांवर काम करणाऱ्या स्थानिक पुढाऱ्यांना पद नाही. मात्र, या संस्थांना पदाधिकारी नसल्याने लातूर-धाराशिव-बीड स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकही अधांतरीच आहे. (Vidhan Parishad Election News)

कायम काँग्रेसचे (Congress) वर्चस्व राहिलेल्या लातूर-धाराशिव-बीड या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार आता भाजपचे सुरेश धस (Suresh dhas) प्रतिनिधित्व करत आहेत. यापूर्वी जिल्ह्यातील दिवंगत लोकनेते बाबूराव आडसकर यांनीही या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. काँग्रेसेचे जेष्ठ नेते दिलीपराव देशमुख यांनी सलग तीन वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले.

लातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी बीड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदांचे सदस्य, नगर पालिकांचे नगरसेवक, नगर पंचायतींचे नगरसेवक, मतदार आहेत. मात्र, 2021 च्या अखेरीस नगर पालिकांची मुदत संपली असून फेब्रुवारी 2022 साली जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची मुदत संपली आहे.

या प्रमुख तीनही संस्थांवर प्रशासक आहेत. परिणामी मतदारच नाहीत. त्यामुळे आता पुढच्या जून महिन्यात या मतदार संघाची मुदत संपत असली तरी आता मतदारांअभावी निवडणुका अधांतरीच आहेत. जून महिन्यात सुरेश धस यांची आमदारकीची मुदत संपत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, दिवंगत लोकनेते बाबूराव आडसकर यांच्यानंतर दिलीपराव देशमुख यांनी सलग तीन वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. मागच्या वेळी 2018 साली दिलीपराव देशमुख यांनी निवडणुक लढविणार नसल्याचे जाहीर केले.

वास्तविक या मतदार संघात त्यावेळी आघाडी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांची बेगमी भाजपपेक्षा अधिक होती. मात्र, राष्ट्रवादीने काँग्रेसने (Ncp) हा मतदारसंघ काँग्रेसकडून सोडून घेत हिंगोली-परभणी हा मतदारसंघ काँग्रेसला दिला. त्यावेळी तेथून काँग्रेसचा पराभव झाला. तर, कमी मते असूनही लातूर-धाराशिव-बीडमधून भाजपचे सुरेश धस 35 मतांनी विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेस पुरस्कृत अपक्ष असलेल्या अशोक जगदाळे यांचा पराभव केला होता.

या मतदारसंघात लातूर जिल्ह्यात 353 मतदार असून बीड जिल्ह्यात 361 मतदार आहेत. तर, धाराशिव जिल्ह्यात 291असे एकूण 1005 मतदार आहेत. लातूर-धाराशिव- बीड मतदार संघाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क असलेल्या या तीन जिल्ह्यांतील बीड जिल्ह्यात चार नगर पंचायतींचे सदस्य, लातूर जिल्ह्यात पाच नगर पंचायतींचे सदस्य तर धाराशिव जिल्ह्यात दोन नगर पंचायतींचे सदस्य कार्यरत आहेत.

तीनही जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदा तसेच बीडच्या सात नगर पालिका त्याच बरोबर लातूर जिल्हा परिषदेसह चार नगरपालिका, 11 पंचायत समितीचे सभापती आणि धाराशिव जिल्हा परिषदेसह, 8 पंचायत समितीचे सभापती, आठ नगर पालिकांवर प्रशासक आहे. त्यामुळे निम्म्याहून अधिक संस्थांवर प्रशासक असल्याने तेवढे मतदार सक्रीय नाहीत. आता केवळ 20 टक्के संस्थांचे (नगर पंचायती) मतदार असून उर्वरित 80 टक्के मतदारच नाहीत. त्यामुळे लातूर-धाराशिव-बीड स्थनिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक अधांतरी आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT