BJP-Congress Politics : मराठवाड्यात सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकींचा काळ आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी जिल्हा बँकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. महायुतीच्या नेतृत्वाखाली पॅनलने यात बाजी मारत सत्ता मिळवली. लातूर जिल्हा बँकेची निवडणूक लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर लातूरचे राजकारण तापले आहे. माजी मंत्री तथा विद्यमान भाजप आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांनी एका जाहीर कार्यक्रमात लातूर जिल्हा बँकेच्या कारभारावर टीका केली होती. देशमुखांच्या गाडीमध्ये टाकले जाणारे डिझेल, पेट्रोल सुद्धा लातूर जिल्हा बँकेतील पैशातून टाकले जाते, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता.
देशमुख कुटुंबियांनी प्रामाणिकपणे निवडणूक लढवली तर त्यांचे डिपाॅझीट जप्त होईल, असे म्हणत निलंगेकरांनी आगामी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी त्यांना आव्हान दिले होते. लातूर जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले जात नाही, असा आरोप करत भाजपने दंड थोपटले खरे, पण महायुतीतील त्यांच्या मित्र पक्षाने निवडणुकीआधीच त्यांची कोंडी केली आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार पारदर्शकच आहे, उगाच अपप्रचार करू नका, असे म्हणत त्यांनी निलंगेकरांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 47 व्या सर्वसाधारण सभेत आमदार अमित देशमुख, बँकेचे चेअरमन धीरज देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या भाषणाची सध्या जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहे.
दिलीपराव देशमुख यांनीही आपल्या भाषणात छोट्या लोकांच्या नादी लागायचे नसते, ते चुकीच्या माहिती आधारे आरोप करत असतात, आपण त्यांना आपल्या चांगल्या कामातून उत्तर द्यायचे असते. वेळ आली की बोलूच, पण तोपर्यंत शांत राहायचे, असा सूचक इशारा निलंगेकर यांचे नाव न घेता दिला होता.
त्यानंतर आता सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बँकेच्या सर्वसाधारण सभेला हजेरी लावत संचालक मंडळाला पारदर्शक कारभाराचे प्रमाणपत्र देऊन टाकले. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्याआधीच भाजपा बॅकफूटवर गेल्याची चर्चा आहे.
निलंगेकरांचे आरोप..
शेतकऱ्यांच्या नावावर घेतल्या जाणाऱ्या कर्जाच्या रकमेचा मोठा हिस्सा स्वतःच्या संस्थांकडे वळवला जातो, असा गंभीर आरोप संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्हा बँकेच्या कारभारावर टीका करताना केला होता. कर्जातील ८० टक्क्यांहून अधिक रक्कम स्वतःच्या संस्थेला वाटल्याचा आरोप करतनाच शेतकऱ्यांना कर्ज देताना २० टक्के रक्कम डिपॉझिट म्हणून कापण्यात आली आणि त्यातून सुमारे अडीच हजार कोटी रुपये जमा झाले. हे पैसे नेमके कुठे गेले?, असा सवाल निलंगेकरांनी केला होता.
बँकेच्या कर्जवाटपाची आणि एकूण कारभाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. चौकशी होईपर्यंत बँकेवर प्रशासक नेमावा आणि त्यानंतरच निवडणूक घ्यावी, असेही निलंगेकर म्हणाले होते. प्रामाणिकपणे निवडणूक झाली तर त्यांचे डिपॉझिट जप्त होईल, असे आव्हान त्यांनी दिले होते. परंतु ज्या सरकारकडे जिल्हा बँकेच्या चौकशीची मागणी निलंगेकरांनी केली, त्या त्यांच्याच पक्षाच्या महायुती सरकारमधील सहकार मंत्र्यांनी जिल्हा बँकेच्या पारदर्शक कारभारावर शिक्कामोर्तब केले. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात अहमदपूर नगरपालिका निवडणूक काळात युती तोडल्यामुळे मोठा वाद झाला होता. राष्ट्रवादीने स्वबळावर ही नगरपालिका आपल्याकडे राखली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.