Sambhaji Patil Nilangekar Sarkarnama
मराठवाडा

Sambhaji Patil Nilangekar: शृंगारेंच्या विजयाची जबाबदारी दिलेल्या निलंगेकरांच्या मतदारसंघात काँग्रेस नंबर वन

Jagdish Pansare

Latur News: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मराठवाड्यातील बहुतांश मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना महाविकास आघाडीने धूळ चारली. आमदार-मंत्री असलेल्या जिल्ह्यातही महायुतीची अवस्था बिकट झाल्याचे पहायला मिळाले.

लोकसभेच्या लातूर मतदारंसघात (Latur Lok Sabha 2024) भाजपने सुधाकर शृंगारे यांच्या विजयाची जबाबदारी माजी मंत्री तथा निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर सोपवली होती. मात्र त्यांच्या निलंग्यात महाविकास आघाडीचे डॉ. शिवाजी काळगे यांना मताधिक्य मिळाले.

निलंगा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सुधाकर शृंगारे यांना 84363 तर काँग्रेसच्या काळगे यांना 104580 मते मिळाली. म्हणजेच 20 हजारांहून अधिक लीड निलंगेकर यांच्या मतदारसंघातून काँग्रेसला मिळाली. भाजपमधील अंतर्गत कुरबुरुची फटका यावेळी शृंगारे यांना बसल्याचे दिसून आले.

लातूर जिल्ह्यात झिरो असलेल्या भाजपला हिरो करण्यात संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांची महत्वाची भूमिका होती. जिल्हा परिषद, महापालिका, विधानसभा, लोकसभा अशा सगळ्याच निवडणुकीत गेल्या दहा वर्षात भाजपने लातूर जिल्ह्यात भरारी घेतली होती. परंतु दरम्यानच्या काळात जिल्ह्यात घडलेल्या घडामोडी, कुरघोडीचे राजकारण आणि एकाच पक्षात असून नेते, लोकप्रतिनिधींची विरुद्ध दिशेला असलेली तोंड याचा फटका सुधाकर शृंगारे यांना बसला.

लोकसभेसाठी शृंगारे यांच्या नावाची चर्चा सुरू होती, तेव्हा त्यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका, मतदारसंघाशी संपर्क नसलेला खासदार म्हणून टीका झाली. त्यामुळे भाजप त्यांचे तिकीट कापणार, अशी चर्चा सुरु होती. पण अखेरच्या क्षणी भाजपच्या यादीत लातूरमधून शृंगारे यांचे नाव जाहीर झाले.

त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने उच्चशिक्षत डॉक्टर असलेला चेहरा काळगे यांच्या रुपाने मैदानात उतरवला. संपुर्ण देशमुख कुटुंबाने काळगेंच्या विजयासाठी शक्ती पणाला लावली. याचे फळ काँग्रेसला मिळाले आणि लातूरची जागा भाजपकडून खेचून घेण्यात देशमुखांना यश मिळाले. उदगीर वगळता काँग्रेसच्या काळगे यांना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले आहे.

उदगीर मतदारसंघातून भाजपच्या शृंगारे यांना 4800 मतांची आघाडी मिळाली. मराठा आरक्षणाच्या विषयावर सरकारची सकारात्मक बाजू मांडण्यास आम्ही कमी पडलो, अशी कबुली संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. भाजपने दिलेल्या अब की बार चार सौ पार चा संबंध काँग्रेसने थेट संविधान बदलाशी जोडला.

तो अपप्रचार खोडून काढण्यात आम्ही अपयशी ठरलो, असेही निलंगेकरांनी पराभवाची कारणे देताना सांगितले. एकूणच लातूरमधील भाजपचा पराभव हा मराठा फॅक्टरमुळे झाला असला तरी त्याला भाजपमधील अंतर्गत नाराजी, नेत्यांमधील बेबनाव देखील कारणीभूत ठरला आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT