Latur Lok Sabha Election Sarkarnama
मराठवाडा

Latur Lok Sabha Election : 'लातूरकरांचं हक्काचं पाणी देशमुखांनी पळवलं'; निलंगेकर पाटलांनी डिवचंल!

राम काळगे

Latur News : धनेगाव येथील मांजरा प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. हे पाणी लातूरकरांसाठी आरक्षित असताना देखील शहराला बारा दिवसांनी पाणी मिळते. प्रकल्पातून मात्र दररोज पाणी उचलले जाते. हे पाणी लातूर शहरात पेाहोचण्यापूर्वीच आमदार अमित देशमुख यांच्या कारखान्यासाठी वापरले जाते. लातूरकरांच्या हक्काचे पाणी कारखान्यासाठी पळविणार्‍यांना या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवून द्या, असा हल्लाबोल आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला.

महायुतीचे लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ लातूर शहरात झालेल्या सभेत निलंगेकर यांनी अमित देशमुख यांच्यावर निशाणा साधला. "लातूरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पाण्यावरून त्यांनी अमित देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. मुळात लातूरमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्यासारखी परिस्थिती नाही. लातूरला पुरेल एवढे पाणी प्रकल्पात शिल्लक आहे. धरणातील पाणी लातूरमध्ये येण्यापूर्वीच देशमुखांच्या कारखान्यासाठी पळविले जाते, असे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"निलंगा शहरात आम्ही दररोज पाणीपुरवठा करतो, मग इथे का होऊ शकत नाही. दिवंगत विलासराव देशमुख यांच्या नावाने आजही मते मागितली जातात. त्यांचे कर्तृत्व निश्‍चितच मोठे असून ते आम्हाला ज्ञात आहे. मात्र, त्यांचा वारसा पुढे चालविणार्‍यांनी आपले कर्तृत्व सिध्द केले नाही, असा टोलाही निलंगेकर यांनी लगावला. पालकमंत्री असताना देशमुखांनी लातूरसाठी काहीही केले नाही. कोविडच्या काळात ते परदेशात निघून गेले," असेही निलंगेकर म्हणाले.

"जनतेला औषधी, इंजेक्शन व रेशन पुरवठा करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्हीच केले. रेल्वेने पाणी आणण्याची वेळ येणे हेच त्यांचे कर्तृत्व असून अशा व्यक्तींच्या सांगण्यावर आपण मतदान करणार का ?ठ असा सवालही निलंगेकर यांनी केला. "लिंगायत समाजाबद्दल या निवडणुकीत मोठी चर्चा होत आहे. देशमुख यांनी लिंगायत समाजाचा केवळ वापर केला. परंतु, समाजाच्या समस्या सोडविल्या नाहीत. तीस वर्षांपासून प्रलंबित स्मशानभूमीचा प्रश्‍न आम्हीच सोडविला, असेही ते म्हणाले.

महामार्गाच्या कामात महात्मा बसवेश्‍वरांचा पुतळा हलवू दिला नाही, हे समाजाने पाहिलेले आहे. जिल्हा परिषद ताब्यात आल्यानंतर लिंगायत समाजातील सामान्य व्यक्तीला आम्ही अध्यक्षपद देऊन मंत्रीपदाचा दर्जा मिळवून दिला. समाजाच्या विकासासाठी जे करणे शक्य आहे ते आम्ही केले. उलट काँग्रेसने (Congress) लिंगायत समाजावर केवळ पुतणा मावशीचे प्रेम केल्याचा आरोप निलंगेकर यांनी केला.

"आपण आता पुढच्या पिढीसाठी मतदान करणार आहोत. मागील दहा वर्षात देशाात एकही दंगल झाली नाही, कुठे बॉम्बस्फोट झाला नाही. देशात शांतात व सुरक्षितता ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा त्या पदावर बसविणे आवश्यक आहे. यासाठी सुधाकर शृंगारे यांना विजयी करा," असे आवाहनही निलंगेकर यांनी केले.

"या निवडणुकीत प्रचारापेक्षा अपप्रचार जास्त होत आहे. त्यात लिंगायत समाज टार्गेटवर आहे. परंतु, समाजाने अपप्रचाराला बळी पडून पापात सहभागी होवू नये. देशात मजबूत सरकार देण्यासाठी हे मतदान आहे. लिंगायत समाजाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे विशेष लक्ष आहे. त्यामुळे डॉ. अजित गोपछडे व खासदार सुधाकर शृंगारे यांच्याकडून समाजाच्या विविध अडचणी सोडवून घेता येतील," असे अर्चना पाटील आपल्या भाषणात म्हणाल्या.

(Edited by - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT