Pankaja Munde
Pankaja Munde Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde : पराभव झाल्याने खूप शिकायला मिळालं; पंकजा मुंडेंनी सांगितल्या अनुभवाच्या गोष्टी

सरकारनामा ब्युरो

Beed News : देशात पंतप्रधान जीव तोडून काम करतात. त्यांनी 'सबका साथ, सबका विकास' या धोरणातून काम करण्यास नेहमीच प्राधान्य दिला. आता त्यास 'सबका विश्वास' याचीही जोड लाभली आहे. 'सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास' यामुळे प्रत्येक काम यशस्वी होण्यास मदत मिळत आहे. यातून साथीला विश्वासाची गरज असल्याचे त्यांनी जाणले आहे. मोदी प्रचाराला जातात तेव्हा ते संघटना म्हणून जातात. तर निर्णय घेताना देशाचे पंतप्रधान म्हणून घेतात, असे मत भाजपच्या नेत्या, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) बीड येथे बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी पराभव झाल्याचा जास्त फायदाच झाल्याचे सांगितले. ते म्हणाल्या, "पराभवामुळे वेळ मिळाला, त्या वेळेतून मला जे काही शिकायला मिळाले, मला जे अनुभवायला मिळाले ते अभूतपूर्व आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझ्या पराभवांच दुःख माझ्या मतदारसंघातील लोकांसह राज्यातील लोकांना झाले, हे अनुभवायला मिळाले, हे माझे मोठे भाग्य आहे."

यानंतर त्यांनी केंद्रात काम करण्याची संधीही मिळाल्याचे सांगितले. मुंडे म्हणाल्या, "मला केंद्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली. केंद्रात काम करताना देशातील अत्यंत प्रगत मध्यप्रदेशात काम करायला मिळणे हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट. चार वेळा मुख्यमंत्री राहूनही शिवराज चौहानसारखे साधे, सरळ, मेहनती मुख्यमंत्री मी पाहिला नाही. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला पराभवामुळे मिळाली. सचिव म्हणून बैठक घेतना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती अनुभवायला मिळत आहे."

यावेळी पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. त्यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा वसा घेतला आहे. तो राज्यातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील नेत्यांना पूर्ण करायचा असल्याचेही मुंडे यांनी संगितले.

पंकजा मुंडे म्हणाल्या, "सचिव म्हणून काम करताना प्रत्येक बैठकीत मोदींना जवळून अनुभवता आले. प्रत्येक संघटनेच्या बैठकीत मोदी मंचावरून एकही मिनीट उठत नाहीत. ब्रेकमध्येच ते बाहेर जातात. त्यांना काय अपेक्षित तर तुम्ही सर्व लाभार्थ्यांपर्यंत सर्व योजना पोहचल्या पाहिजेत. योजनांचा भावार्थ लोकांना समजला पाहिजे. त्यातून राज्यातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील नेत्यांना लोकांपर्यंत पोहचण्याचे आवाहन केले जाते. मात्र त्यांना वाटतं की आपल्याला काम दिले. ते कामाचे मोजमाप संख्येतून करतात. जसे की मोदींना आपण १० लाख पत्र पाठविली, असं यंत्रमानवासारख काम करणे अपेक्षित नाही. त्यांनी ज्या भावनेनी योजाना निर्माण केली आहे, त्यांनी जी गरीबी अनुभवली आहे, त्यातून गरीब कल्याणाचा जो मंत्र घेतला आहे तो पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे. एकात्म मानवतावादाचा पंडित दिनदयाळ उपाध्यायांचे स्वप्न पूर्ण करण्याचा वसा त्यांनी घेतला आहे, ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण केलेल्या कामाचे बाजारीकरण नकोय, फोटोसेशन नकोय."

यानंतर मुंडे यांनी वडील गोपीनाथ मुंडे यांच्या कामचा एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, "आम्ही लहान असताना तीन खोल्यांचे घर होते. त्यावेळी मुंडेसाहेब बाहेर गेले की कधी येतील सांगता येत नव्हते. ते २०-२२ दिवस प्रचार केल्यानंतर घरी परतत होते. त्यावेळी आई त्यांची कपडे धूत असते. त्या कपड्यातून माती बाहेर पडायची. त्यातून ते किती फिरले असतील याचा अंदाज येत होता. त्या पद्धतीने काम करणे आजही गरजेचे आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT