Dharashiv Loksabha News Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Loksabha : धाराशिव लोकसभेसाठीही भाजपचे धक्कातंत्र, इच्छुकांची बोबडी वळणार!

अय्यूब कादरी

Dhrashiv News : विधानसभा, लोकसभेची उमेदवारी असो, की मुख्यमंत्र्यांची निवड, अलिकडच्या काळात भाजपने प्रत्येक ठिकाणी धक्कातंत्राचा वापर केला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांची निवड करताना भाजपने धक्कातंत्र वापरून सर्वांचे अंदाज चुकवून टाकले. मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत असलेल्या तिन्ही राज्यांतील चेहऱ्यांना डावलले. आता आगामी लोकसभा निवडणुकीतही उमेदवारी देताना असेच काही पाहायला मिळणार आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातही असेच धक्कातंत्र वापरण्याची तयारी भाजपने सुरू केली असल्याचे सांगितले जात आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपने अनेक सनदी अधिकाऱ्यांना संधी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतही जवळपास 50 आजी-माजी आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात भाजपकडून 12 ते 15 जणांचे तिकीट कापून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यात आठ ते दहा आजी-माजी आयएएस,आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश असेल. हे धक्कातंत्र धाराशिव लोकसभा मतदारसंघात वापरले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

या मतदारसंघावर महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही दावा केला आहे. आता भाजपकडून धक्कातंत्राचा वापर करून एका सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्याला उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. 1985 च्या बॅचचे आयएएस असलेल्या या अधिकाऱ्याने राज्यात अनेक महत्त्वाच्या पदांवर लक्षणीय कामगिरी केली आहे. काही काळ त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघातही महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

सेवानिवृत्त झालेले हे आयएएस अधिकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिवपदाच्या दर्जाचे अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. मुख्य सचिवपदाने मात्र त्यांना हुलकावणी दिली. ते सेवानिवृत्त झालेले असले तरी फडणवीस यांनी त्यांच्यावर एका महत्वाच्या विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे.

किल्लारी-सास्तूर भागात 1993 मध्ये प्रलंयकारी भूकंप झाला होता. त्यावेळी ते या भागात जिल्हाधिकारी होते. भूकंपग्रस्त भागात मदतकार्य आणि व्यवस्थापन, समन्वयाची जबाबदारी त्यांनी अत्यंत चोखपणे बजावली होती. गेल्या आठ, नऊ महिन्यांपासून ते धाराशिव लोकसभा मतदारसंघात चाचपणी करीत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. या भागात त्यांचे दौरेही वाढलेले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धाराशिव लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी महायुतीतील सर्वच पक्षांत स्पर्धा लागली आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाने या मतदारसंघावर दावा केला आहे. शिंदे गटातून माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड हे इच्छुक आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनीही तयारी सुरू केली आहे. भाजपमधून लढण्याची बसवराज मंगरुळे यांचीही तयारी सुरू आहे. शिंदे गट, अजित पवार गटाकडून मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे.

भाजपमध्येही इच्छुकांची संख्या असली तरी मतदारसंघ भाजपलाच सुटणार, असा दावा पक्षाच्या नेत्यांनी केलेला नाही. हा मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटणार, याचा निर्णय महायुतीतील तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील, असे तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी याआधीच स्पष्ट केले आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली होती. त्यानुसार या मतदारसंघावर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून दावा सांगण्यात आला आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर विजयी झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादीत असलेले राणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव झाला होता. खासदार राजेनिंबाळकर आता ठाकरे गटात आहेत. असे असले तरी महायुतीत शिवसेना म्हणून ही जागा आमचीच, असा युक्तिवाद शिंदे गटाकडून केला जात आहे. अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचा युक्तीवादही असाच आहे.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 10 जानेवारी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 13 जानेवारीला त्यांच्या पक्षांचे मेळावे आयोजिण्यात आले होते, मात्र दोन्ही पक्षांनी ते स्थगित केले आहेत.

भाजपला राज्यात 'मिशन 45' यशस्वी करायचे आहे, म्हणजे राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळे सहकारी पक्षांना काही जागांवर तडजोड करण्यासाठी भाजपकडून भाग पाडले जाऊ शकते. याची परतफेड विधानसभेच्या निवडणुकीत सहकारी पक्षांना हव्या त्या किंवा अधिकच्या जागा देऊन केली जाऊ शकते.

धाराशिव मतदारसंघावर महायुतीतील दोन्ही पक्षांकडून दावा केला जात असला तरी भाजपकडून सावध पावले टाकली जात आहेत. हे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आहेत. त्यामुळे ही जागा भाजपला सोडावी, अशी गळ ते मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांना घालू शकतात. तसे झाले तर अन्य इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरले जाणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT