Kalyan Kale, Raosaheb Kale Sarkarnama
मराठवाडा

Jalna Lok Sabha Constituency : पाच वेळा खासदारकीचं मैदान मारणाऱ्या दानवेंविरोधात काँग्रेसकडून पुन्हा जुन्याच खेळाडूला संधी?

Jagdish Pansare

ंJalna Political News : जालना लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विजयी झालेले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानेव यांच्याविरोधात अखेर काँग्रेस पुन्हा जुन्याच खेळाडूला मैदानात उतरवणार आहे. 2009 मध्ये काँग्रेसकडून दानवेंना कडवी झुंज देणारे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांचे नाव जालना लोकसभा मतदारसंघासाठी निश्चित झाल्याची चर्चा आहे. भाजपकडून दानवे यांची उमेदवारीही निश्चित समजली जाते. (Jalna Lok Sabha Constituency)

राज्यातील भाजप उमेदवारांची यादी खिशात घेऊन फिरणाऱ्या दानवेंना जालन्याची उमेदवारी सहाव्यांदा मिळणार असल्याने त्यांनी मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये (MVA) जालना आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघांची अदलाबदल होण्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. परंतु जालन्यातून काँग्रेसच लढणार हे स्पष्ट झाल्यामुळे आता हिंगोली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचाच उमेदवार असणार हेही स्पष्ट झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसरीकडे वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जालन्यातून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी निवडणूक लढवावी, असे आवाहन करत महाविकास आघाडीने त्यांच्यासाठी जागा सोडावी, अशी भूमिका मांडली होती. परंतु आपण राजकारणात जाणार नाही, आपला लढा स्वतःला काही मिळावे यासाठी नसून समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेसने जालन्यातून डॉ. कल्याण काळे यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ घालण्याचे निश्चित केल्याचे समजते.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत कल्याण काळे यांनी भाजपच्या रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना जोरदार टक्कर दिली होती. रावसाहेब दानवे यांचा अवघ्या साडेआठ हजार मतांनीच विजय झाला होता. दानवे यांना 3 लाख 50 हजार 710 तर काँग्रेसच्या कल्याण काळे यांना 3 लाख 42 हजार 228 इतकी मते मिळाली होती. ही झालेल्या एकूण मतदानापैकी 42.93 टक्के एवढी होती, तर रावसाहेब दानवे यांना 44 टक्के इतकी मते मिळाली होती. आता पंधरा वर्षांनंतर पुन्हा काँग्रेसकडून दानवेंविरोधात तोच प्रयोग करण्यात येत आहे. या मतदारसंघात काँग्रेस सातत्याने पराभूत होत आहे.

काँग्रेसचा पारंपरिक मतदार या जिल्ह्यात असल्यामुळे दानवेंविरोधात उमेदवार देणे गरजेचे असल्याचे मत राज्यातील काँग्रेस नेत्यांचे आहे. त्यामुळेच जालन्याच्या बदल्यात हिंगोलीची जागा घेण्याचा प्रस्ताव मागे पडला. शिवाय ठाकरे गटाकडे जालन्यात दानवेंच्या विरोधात टिकू शकेल असा उमेदवार नसल्याने शिवसेनेनेही हिंगोलीतूनच लढण्याचा निर्णय कायम ठेवल्याचे सांगितले जाते. येत्या दोन-चार दिवसांत काँग्रेसकडून कल्याण काळे (Kalyan Kale) यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. जालन्यात होणाऱ्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT