narendra modi | devendra fadnavis sarkarnama
मराठवाडा

Lok Sabha Election 2024 : भाजपचा पुन्हा 'मिशन 45' वर जोर; नेत्यांचा कॉन्फिडन्स वाढला?

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News, 20 May : लोकसभा निवडणूक ( Lok Sabha Election 2024 ) जाहीर होण्यापुर्वीपासून महाराष्ट्रात 'मिशन 45'चा नारा देणाऱ्या महायुतीतील नेत्यांचा आत्मविश्वास मध्यंतरी काहीसा कमी झाला होता.

निवडणूक प्रचारापुर्वी राज्यातील सर्वच महत्वाच्या नेत्यांनी 'मिशन 45'चे उदिष्ठ डोळ्यासमोर ठेवत, तसे दावे आपल्या मेळावे, बैठका आणि सभांमधून केले होते. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाने तर भाजपच्या एक पाऊल पुढे टाकत 'मिशन 48' संवाद दौरे केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांचा हा दांडगा उत्साह पाहता राज्यातून विरोधक भुईसपाट होणार, असेच वाटत होते. परंतु, महाराष्ट्रात लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान झाले, त्यात मतांचा टक्का घसरला आणि 'मिशन 45'चा दावा आणि सभांमधून सातत्याने होणारा उल्लेख काहीसा कमी झाला. मराठवाड्यातील पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी परभणीत महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या सभेत मोदींची भाषा बदलली होती, त्यांच्या विधानातून मतदानाचा घसरलेला टक्का आणि त्याची चिंता स्पष्टपणे दिसत होती. तरीही पहिल्या टप्प्यात जनतेने भाजप आणि महायुतीला भरभरून मतदान केले आहे. पण, "मतदानाचे प्रमाण कमी होणे योग्य नाही. प्रत्येकाने मतदान केले पाहिजे," असे आवाहन मोदी यांनी केले होते.

मतदारांमध्ये सुरुवातीला दिसलेल्या निरुत्साह राज्यात भाजपच्या 'मिशन 45'ला पूरक असा नाही, याची जाणीव महायुतीच्या नेत्यांना झाली होती. त्यामुळेच दुसऱ्या टप्प्यानंतर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात झालेल्या जाहीर सभा, मेळाव्यांमधून 'मिशन45'चा उल्लेख प्रकर्षाने टाळण्यात आला होता.

आज ( सोमवार, 20 मे ) पाचव्या टप्प्यातील आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. यात सर्वाधिक जागा या मुबंई आणि आसपासच्या भागातील आहेत. एकूण 13 मतदारसंघामधील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ती फारसी समाधानकारक नाही.

मुंबई व त्याच्या आसपासच्या भागात मतदानाचे प्रमाण तसेही कमीच असते. पण, राज्यातील निवडणूक प्रचाराचा शेवटचा टप्पा संपला तसा महायुतीच्या नेत्यांकडून पुन्हा 'मिशन 45' चा नारा दिला जाऊ लागला आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पंढरपूरात माध्यमांशी बोलताना आम्ही राज्यात '45' जागा जिंकणार, असा दावा केला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची री ओढत '45' जागा जिंकणार असल्याचे छातीठोकपणे सांगितले आहे.

मध्यतंरी समोर आलेल्या विविध सर्व्हेमध्ये भाजपचे 'मिशन 45' पूर्ण होणार नाही, त्यांना 25-30 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर महाविकास आघाडी 15-18 जागा जिंकेल, असे संकेत देण्यात आले होते. राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा, भाषणांना मिळालेला प्रतिसाद उत्स्फूर्त होता. शिवाय मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील विविध भागात विशेषतः मराठवाड्यात असलेला रोष मतदानातून उमटल्याचे स्पष्ट होत आहे.

भाजपच्या अनेक बड्या नेत्यांचा पराभव होणार, असे अंदाज वर्तवले जात आहे. असे असतांना मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात भाजप-महायुतीकडून पुन्हा 'मिशन 45'चा दावा केला जात असल्याने एवढा कॉन्फिडंस नेत्यांमध्ये आला कुठून? याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसते आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT