BJP and Congress Sarkarnama
मराठवाडा

Lok Sabha Elections 2024 : भाजपच्या 'गाव चलो' आधीच काँग्रेस पोहोचली मतदारांच्या दारी...

Laxmikant Mule

Nanded News: लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आता महायुती आणि महाविकास आघाडीकडून देखील वेग आला आहे. भाजपने कालच लोकसभेच्या सर्व 48 मतदारसंघातून 'गाव चलो अभियाना'ची घोषणा करत साडेतीन लाख घरांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आघाडीनेही मतदारांच्या दारात जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची मोहीम सुरू केली आहे. (Lok Sabha Elections 2024 )

भाजपने 'मिशन 48' हाती घेतले आहे, तर लातूर येथे झालेल्या काँग्रेसच्या विभागीय बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व 48 जागा जिंकण्याच्या तयारीला लागा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. आता कोणाचे मिशन साध्य होते, हे लवकरच दिसून येईल. काँग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची चर्चा सुरू असली तरी त्याची अधिकृत घोषणा होण्यासाठी आणखी दोन आठवडे वाट पहावी लागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

परंतु पक्ष, आघाडी, युती म्हणून दोन्ही बाजूने नांदेड जिल्ह्यात मतदारांशी संवाद साधण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. गावोगावी फिरणारे पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष जो उमेदवार देईल, त्या उमेदवाराला निवडून द्या, असे मतदारांना सांगतांना दिसत आहेत. भारतीय जनता पक्षाने आपले मिशन साध्य करण्यासाठी गाव चलो अभियान सुरू केले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस भाजपच्या आधिच मतदारांच्या दारी जाऊन संवाद साधत आहेत.

मराठवाड्यातील जागा वाटपाचा तिढा सुटला नसला तरी नांदेड जिल्ह्यात महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने व महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने कधी न दिसणारे नेते मंडळी गावात दिसून येत आहेत. भारतीय जनता पक्षाने 'मिशन 48' चे ध्येय गाठण्यासाठी राज्यात 'गाव चलो अभियान' सुरू केले आहे.

या अभियानाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री कार्यकर्ते गावोगावी जाऊन मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात केलेल्या विविध विकासकामांची माहिती देणार आहेत. तसेच गावात मुक्काम करून मतदार, भाजपाचे कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत आहेत. काँग्रेसने मतदारसंघात बैठक, मेळावे घेऊन वातावरण निर्मिती केली आहे. काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हा परिषद गटनिहाय जनसंपर्क अभियान राबवित आहे.

मतदारांच्या दारी जाऊन अडीअडचणी समजून घेतल्या जात आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या विकासकामांची माहिती देण्यात येत आहे. या जनसंपर्क अभियानात चव्हाण कुटुंब उतरले असून माजी आमदार अमिता चव्हाण, श्रीजया व सुजया चव्हाण, डॉ. मिनल पाटील खतगावकर यांच्यासह ज्येष्ठ पदाधिकारी मतदारांशी संपर्क साधत आहेत. गेल्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता.

गेल्या निवडणुकीतील चुका सुधारून नांदेडची जागा जिंकण्यासाठी काँग्रेस सावधपणे तयारी करत आहे. नाराज व पक्षापासून दूर गेलेल्या पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या सर्व निवडणुकीच्या तयारीवर चव्हाणांचे लक्ष आहे. तर दुसरीकडे भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून मीच उमेदवार असल्याचे ते सांगत आहेत. चिखलीकरांनी आपली स्वतंत्र निवडणूक यंत्रणा कामाला लावली आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT