Beed crime news : वाढती गुन्हेगारी, अपहरण, खंडणी, खून, दरोडे, महिलांवरील अत्याचार आणि आरोपींना पोलिसांकडून मिळणारा अभय यामुळे बीड जिल्हा राज्यभरात बदनाम झाला आहे. गेल्या दोन वर्षात बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख सारखा वर जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी बदलून पाहिले मात्र गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढतच गेली. या पार्श्वभूमीवर राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनीच आता बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश लावण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील महिन्यात पोलीस महासंचालक दोन दिवसांच्या बीड दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी आणि पोलीस दलातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईचा दंडुका चालवला जाणार आहे. स्वतः पोलीस महासंचालक बीड दौऱ्यावर येत असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.
वाढत्या गुन्हेगारीचा आलेख, पोलीस प्रशासनातील काही निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांचा कच्च्याचिठ्ठा पोलीस महासंचालकांसमोर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची दोन कोटींच्या खंडणी प्रकरणातून आधी अपहरण आणि त्यानंतर झालेली हत्या याचे मोठे राजकीय पडसाद बीड जिल्हा आणि राज्यभरात म्हटले होते.
या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्याची चर्चा देशभरात वेगळ्या अर्थाने झाली. जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाल्यामुळे वर्षानुवर्ष या जिल्ह्याचे राजकीय प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांच्या प्रतिमेलाही याचा फटका बसला. आरोपींशी असलेली जवळीक यातून तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांना आपले मंत्रिपदही गमवावे लागले. बीड मधील वाढत्या गुन्हेगारीमुळे जिल्ह्यातील सामाजिक वातावरणही बिघडले.
या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक सदानंद दाते सहा व सात ऑगस्ट रोजी होणारा बीड जिल्हा दौरा अत्यंत महत्त्वाचा समजला जात आहे. बीड जिल्ह्यात होणारा कुठलाही खून किंवा महिला अत्याचाराचा संबंध थेट जातीशी जोडला जाऊन त्याचे राजकीय भांडवल करण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सर्रासपणे सुरू आहे. यावरही अंकुश मिळवणे अत्यंत गरजेचे आहे. पोलीस महासंचालकांच्या बीड दौऱ्याने परिस्थिती बदलते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या वर्षभरात बीड जिल्ह्यामध्ये महिला व अल्पवयीन मुलींच्या अत्याचारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. याशिवाय खुनाच्या घटना आणि दंगली यांचे प्रमाणही कमालीचे वाढल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. चोरी, घरफोडी विनयभंग, खुनाचा प्रयत्न, अपहरण अशा घटनांमध्ये काही प्रमाणात घट झाली असली तरी इतर वाढलेल्या गुन्हेगारीने त्यावर मात केली आहे.
बीड जिल्ह्यातील काही पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे राजकीय नेत्यांशी असलेले कनेक्शन आणि त्यातून गुन्हेगारांना मिळणारा अभय याच्याही अनेक तक्रारी जिल्ह्यात आहेत. वर्षानुवर्षे बीड आणि जिल्ह्याभोवतीच 'सेवे'त राहिलेल्या आणि राजकीय कनेक्शन जपत गुन्हेगारांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांची डीजीपी दाते हे झाडाझडती घेण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत या अधिकारी कर्मचाऱ्यांवर केवळ नियंत्रण कक्षामध्ये बदली एवढेच कारवाईचे स्वरूप होते. मात्र पोलीस महासंचालकांच्या बीड दौऱ्यात अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पोलीस अधीक्षक पदी नवनीत कावत यांची निवड करण्यात आली. त्यांच्या कार्यकाळात मोठ्या कारवाया करण्यात आल्या. गरज नसताना रिवाल्वर चे लायसन्स घेऊन दहशत माजवणाऱ्यांवर लायसन्स निलंबनाची कारवाई करत कावत यांनी धडाकेबाज कारवाई केली.
जातीय तणाव आणि त्यातून आपली राजकीय पोळी भाजून घेऊ पाहणाऱ्या राजकीय पुढार्यांनाही कावत यांनी वठणीवर आणल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे पोलीस महासंचालकांकडून त्यांच्या कामाचे कौतुक आणि राबवण्यात आलेल्या उपक्रमांची स्तुती होण्याची शक्यता आहे. एकूणच पोलीस महासंचालकांच्या बीड दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.