Manoj Jarange Patil News
Manoj Jarange Patil News Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil News : उपोषणाचा चौथा दिवस, बीपी लो, शुगर घसरली; जरांगेंच्या प्रकृतीने प्रशासन हादरले..

Jagdish Pansare

Chhatrapti Sambhaji Nagar : मराठा समाजाला सगेसोयरे यांच्यासह ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे 8 जूनपासून उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा मंगळवारी चौथा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. रक्तदाब कमी झाला, शुगर लेवल घसरली आहे, त्यामुळे त्यांना तातडीने उपचारांची गरज असल्याचे त्यांच्या प्रकृतीवर देखरेख करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने सांगितले. (Manoj Jarange Patil News)

जरांगे पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत उपचार घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने प्रशासन हादरले आहे. या पार्श्वभूमीवर अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यांना उपचार घेण्याची विनंती केली मात्र, जरांगे पाटील यांनी ती धुडकावून लावली. जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी हे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहेत.

उपचार घेण्याचा डाॅक्टरांनी दिलेला सल्ला जरांगे यांनी नाकारत उपचार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. मनोज जरांगे यांच्या प्रकृतीविषयीची माहिती तहसीलदार शेळके (Chandrakant Shelke) यांनी शासनाला कळवली आहे. डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी केली. सकाळपासून मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या शरीरातील रक्तदाब खालावला आहे.

उपोषणाचा चौथा दिवस असल्याने त्यांच्या रक्तातील साखरेची पातळीही घसरली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना शक्य तितक्या लवकर उपचारांची गरज असल्याचे आरोग्य जिल्हाधिकारी जयश्री भुसारे (Jayshree Bhusare) यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. आम्ही जरांगे यांना उपचार घेण्यासाठी विनंती केली, परंतु त्यांनी नकार दिल्याचेही त्या म्हणाल्या.

जरांगे पाटील यांच्या प्रकृतीवर वडीगोद्री येथील वैद्यकीय पथकासह सिव्हील सर्जन डॉ. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भुसारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड, वैद्यकीय अधिकारी अनिल वाघमारे, डॉ. बिराजदार, डॉ. दीपक सोनावणे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र गाईके लक्ष ठेवून आहेत.

सरकारकडून अद्याप संपर्क नाही

तत्पु्र्वी मंगळवारी सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला. सरकारकडून अद्याप संपर्क करण्यात आलेला नाही. बैठक घेणार, पथक, शिष्टमंडळ पाठवतो या नुसत्या चर्चा आहेत. सरकार लक्ष देत नाही, नुसतं गोडं बोलतंय, अशी टीका मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलतांना केली होती.

आंदोलनाकडे कानाडोळा

दोन दिवसांपासून भर पावसात समाज या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी उभा आहे. सरकारने याची जाणीव ठेवावी, मी माझ्या मागणीवर ठाम आहे, सरकारला चर्चा करण्यासाठी वेळ नाही, सरकार गोड बोलून फसवणूक करत आहे, असा आरोप करत जरांगे यांनी चार दिवसात कोणीही आले नसल्याचे सांगत सरकार आंदोलनाकडे कानाडोळा करत असल्याचे म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT