Maratha Reservation : मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे पळपुटे आहेत. त्यांनीच मराठा समाजाचे वाटोळे केले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारला पाहिजे, जातीसाठी मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी विखे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.
मंत्री राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे ऐकून मराठा समाजाचे वाटोळे केले. सुरवातीला वाटले समाजाचे कल्याण करतील, पण त्यांनी नुकसान केल आहे. आम्ही सरकारला समजून घेणार नाही. विखे यांनी समितीमधून समाजाचे मोठे नुकसान केले आहे.
विखे अंतरवाली सराटीत आले किंवा नाही आले तरी काही फरक पडणार नाही. त्यांनी अंतरवालीत येऊ नये. देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांचे काम करू देत नाहीत, असे विखे पाटील यांनी जाहीर करण्याची हिंमत दाखवावी. विखे यांनी फडणवीस यांचे स्वप्न पूर्ण केले आणि मराठा समाजाचे वर्ष वाया घातले, असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
हैदराबाद, सातारा गॅजेट देतो म्हणाले, 58 लाख कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र देतो म्हणाले, पँ यांनी काहीच दिले नाही. इसिबीसी एकनाथ शिंदे यांनी दिले, विखे म्हणतात हे होतच नाही. फडणवीस यांचे गुणगान गायचे आणि शरद पवारांनी काही दिले नाही हे वारंवार सांगायचे काम फक्त विखे करत आहे.
सरकारने काही दिले नाही, तुम्ही दिले व रद्द करून नुकसान केले. त्यांनी काही दिले नाही एवढंच सांगायला विखे यांना अंतरवाली सराटीत पाठवले जात होते. त्यांनी दिले नाही, वाटोळे केल नाही, तुम्ही देऊन रद्द केले व नुकसान केले.
मराठ्यांसाठी तुम्ही कलंक आहात. मराठा क्रांती मोर्चा, मराठा संघटना, समन्वयक फोडून त्यांना विरोधात बोलण्यासाठी विखे व दोन तीन मंत्री, काही आमदार यांनी काम केले असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला.
अंतरवालीत येऊ नका..
तुम्ही काय केल सांगा? मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री संजय शिरसाट यांनी प्रमाणपत्र देऊन रद्द केले. मराठा समाजाचे हे मोठे नुकसान आहे. मराठ्यांना काहीच मिळाले नाही याचे खापर तुमच्यावर फुटणार आहे. तुम्ही अंतरवाली सराटीत येऊ नका, म्हणत जरांगे यांनी विखे पाटील यांच्याबद्दल संताप व्यक्त केला.
मला बोलायला लावू नका..
मला बोलायला लावू नका, मराठा क्रांती मोर्चा फोडणे, समन्वयक फोडून त्यांना साथ देणे आदी कामे तुम्ही केली. मी खुप बोलणार आहे, मराठ्याचे वाटोळे मंत्री विखे यांच्यामुळे झाले आहे, मराठा समाज तुमच्यामुळे खूप मागे आला. सातारा संस्थानचे गॅझेट वर्षभरात देतो असे सांगीतले होते, आम्ही एक वर्ष विखे यांच्यावर विश्वास ठेवला, असेही जरांगे पाटील म्हणाले.