manoj jarange patil girish mahajan sarkarnama
मराठवाडा

Video Manoj Jarange Vs Girish Mahajan : जरांगेंचा भाजपच्या संकटमोचकांना इशारा; म्हणाले, मी जिवंत असेपर्यंत...

Akshay Sabale

मराठा आणि कुणबी एक नसल्याचं सिद्ध करावं. तिकडे माध्यमांत नाहीतर माझ्यासमोर येऊन बोलावं. तिकडे गप्पा ठोकायच्या नाहीत. मराठा आणि कुणबी एक असल्याचं मी सिद्ध करून देतो, असं आव्हान मनोज जरांगे-पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांना दिलं आहे.

"आम्ही मराठा समाजाच्या बाजूनं आहोत. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. मात्र, मनोज जरांगे यांचे समाधान होतच नसेल, तर आता आम्ही काय करणार. सगेसोयरे यांना पण आरक्षण द्या, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, ते न्यायालयामध्ये टिकणार नाही," असे वक्तव्य राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन ( Girish Mahajan ) यांनी केलं होतं.

"माझ्या माहितीप्रमाणे ‘सगेसोयरे’ अशाप्रकारे आरक्षण देता येत नाही. पण त्यामध्ये काही करता येत असेल, तर सरकार निश्चित प्रयत्न करेल," असेही महाजन यांनी स्पष्ट केले. यानंतर जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनी गिरीश महाजन यांचा समाचार घेतला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

जरांगे-पाटील म्हणाले, "मराठा आणि कुणबी एक नसल्याचं सिद्ध करावं. तिकडे माध्यमांत नाहीतर माझ्यासमोर येऊन बोलावं. तिकडे गप्पा ठोकायच्या नाहीत. मराठा आणि कुणबी एक असल्याचं मी सिद्ध करून देतो. सरकसकट आरक्षण द्या. ज्यांना घ्यायचे ते घेतली. कुणालाही जबरदस्ती नाही. ज्यांना कुणबीचे प्रमाणपत्र काढायचे ते काढतील. ज्यांना मराठा आणि कुणबी म्हणून राहायचं ते राहतील."

"हैदराबाद गॅझेट सरकारनं 13 जुलैंच्या आतमध्ये लागू करावे. सरकार बदलू शकते, मग आम्ही का बदलू शकत नाही. न्यायाधीश चर्चेसाठी आलेले तेव्हा, गिरीश महाजन, सरकारचे सचिव, सात मंत्री सुद्धा उपस्थित होते. तेच महाजन आता आरक्षण टिकत नाही, असं म्हणत आहेत. याचा अर्थ हा डाव आहे," असा आरोप जरांगे-पाटील यांनी केला.

"ओबीसींची यादी झाली, त्यात मराठा आणि कुणबी एकच असल्याचं सांगितलं आहे. कायद्यापेक्षा मोठं कुणी नाही. त्यामुळे सरसकट आरक्षण द्या. तुम्ही आता आरक्षण मिळू शकत नाही, म्हणून मागे हटला. पण, आम्ही मागे हटणार नाही. महाजन मराठा समाजात संभ्रम निर्माण करत आहेत. सगेसोयरे आरक्षण टिकते. मी जिवंत आहे, तोपर्यंत मराठा समाजाचा ओबीसीत समावेश केल्याशिवाय शांत बसणार नाही," असा इशारा जरांगे-पाटलांनी महाजन यांना दिला आहे.

"ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. जर आरक्षण नाही, दिलं तर 13 जुलैनंतर 288 उभे करायचे की 288 पाडायचे हे ठरविणार आहे. आरक्षण देणारेच आपण बनू. तेव्हा मराठा आरक्षणाचा कायदा बनवून घेऊ," असं जरांगे-पाटलांनी सांगितलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT