Manoj Jarange Patil  Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : 'तुम्ही सरकारची बाजू घेताय का?' जरांगेंच्या थेट प्रश्नावर महिला जिल्हाधिकाऱ्यांचं धक्कादायक उत्तर, म्हणाल्या, फाशी घेण्याची वेळ आली तर...

Manoj Jarange Patil and Collector Ashima Mittal : मनोज जरांगेंनी महिला जिल्हाधिकाऱ्यांना थेट विचारलं, 'तुम्ही सरकारची बाजू घेताय का?' यावर त्यांनी दिलेलं धक्कादायक आणि भावनिक उत्तर चर्चेत आलं आहे.

Rashmi Mane

मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटी येथील आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून, मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सरकार आणि आंदोलनकर्त्यांमधील चर्चा अधिक तीव्र झाली आहे. आंदोलन मागे घेण्यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरू असतानाच, जालना जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्या भेटीने चर्चेला नवे वळण मिळाले आहे.

मंगळवारी रात्री जालना जिल्हाधिकारी अशीमा मित्तल या अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचल्या. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने आतापर्यंत कोणती पावले उचलली आहेत, याची माहिती त्यांनी जरांगे पाटील यांना दिली. मात्र, या चर्चेदरम्यान मनोज जरांगे यांनी थेट प्रश्न उपस्थित करत, “तुम्ही सरकारची बाजू घेताय का?” असा सवाल केला.

त्यावर अशीमा मित्तल यांनी शांतपणे, “ते माझे कामच आहे,” असे उत्तर दिले. या उत्तरानंतर दोघांमध्ये काही काळ सविस्तर संवाद झाला. सरकारच्या भूमिकेवर बोलताना मनोज जरांगे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. यावेळी संभाषणाचा नेमका संदर्भ समजून घेत अशीमा मित्तल यांनी, “मनोजजी नोकरी करताना फाशी घेण्याची वेळ आली तरी माझी तयारी आहे,” असे म्हटले.

मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे यांनी त्यांना तात्काळ थांबवले. “तुम्ही जिल्हाधिकारी आहात, तुम्ही फाशी घेण्याची भाषा बोलू नका. हा एक प्रश्न सोडवता आला नाही तर तुमच्यावर फार टीका होईल. हे तुमचं काम नाही, हे तुमच्या लक्षात का येत नाही? तुम्ही या भानगडीत कशाला पडताय?” असे जरांगे म्हणाले.

जरांगे म्हणाले. “तुम्ही अभ्यास करुन मोठी झालेली लेकरं आहात. सरकारमध्ये चौथी नापास झालेले लोक मंत्री झालेले आहेत. ते तुम्हाला शिकवत आहेत, इकडे पाठवत आहेत. तुम्ही रात्रंदिवस अभ्यास करुन या पदापर्यंत पोहोचला आहात. तुमची युपीएससी आणि एमपीएससीची पुस्तकही यापैकी काही मंत्र्यांना वाचता येणार नाहीत. तुम्ही तुमची एनर्जी वाया घालवू नका, इथून जा,” असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या जालना जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांचा प्रशासकीय प्रवासही प्रेरणादायी आहे. मुंबई आयआयटीमधून सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी सुरू केली होती. मात्र, या नोकरीत त्यांचे मन रमले नाही. लोकांसाठी काम करण्याच्या इच्छेतून त्यांनी नोकरी सोडून यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला.

पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. मानववंशशास्त्राचे शिक्षण घेत असताना झोपडपट्टीतील एका आजारी मुलाच्या उपचारासाठी त्यांनी केलेल्या मदतीने त्यांच्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलला. समाजासाठी मोठ्या स्तरावर काम करण्याची प्रेरणा त्यांना या घटनेतून मिळाली.

दुसऱ्या प्रयत्नात 2016 मध्ये यूपीएससीत त्यांना 328 वी रँक मिळाली आणि आयआरएस (आयटी) सेवा मिळाली. मात्र, आयएएस होण्याचे स्वप्न त्यांनी सोडले नाही. पुन्हा प्रयत्न करत त्यांनी यश संपादन केले. यूपीएससीमध्ये 12 वी रँक मिळवत त्यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. 2018 मध्ये त्या नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाल्या.

आता मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आणि जालना जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्यात झालेल्या या थेट संवादाची राज्यभर चर्चा सुरू आहे. आंदोलनाचा पुढील टप्पा आणि सरकारकडून होणारी भूमिका याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT