Manoj Jarange Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil News : 'माझ्या आंदोलनाला 29 ऑगस्टला वर्ष होणार, त्याच दिवशी..' ; मनोज जरांगेंचं मोठं विधान!

सरकारनामा ब्यूरो

दिलीप दखने -

Maratha Reservation News : 'तब्येत साथ देत नाही, पण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी उपोषण करणार. सरकारने धोका दिला आता कारण नको आरक्षण द्या. वेळ वाढवून दिला तरीही सगे सोयरे कायद्याची अमलबजावणी केली नाही. म्हणून पाचव्यांदा उपोषण करावे लागत आहे. आता मागे हटणार नाही. कठोर उपोषण करणार, वैद्यकीय उपचार, पाणी घेणार नाही.' असे स्पष्ट करत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

तसेच '29 ऑगस्टला आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे, त्याच दिवशी मोठा निर्णय घेऊ, असे सांगत जरांगे पाटील यांनी त्याच दिवशी राज्यभरातील मराठा बांधवाची बैठक घेणार असल्याचे जाहीर केले.

आज(शनिवारी) सकाळी मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange) यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु केले आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या, सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करा, हैदराबादसह तिन्ही संस्थानचे गॅजेट लागू करा, शिंदे समीतीला मुदतवाढ, मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घ्या अशा विविध मागण्या जरांगे पाटील यांनी केल्या आहेत.

सरकारला पाहिजे तेवढा वेळ दिला अद्याप शासन निर्णय घेत नाही, कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही जे प्रमाणपत्र आहे त्याच्या व्हॅलीडीटीसाठी अडचणी निर्माण केल्या जात आहेत, असा आरोप केला आहे.

तसेच 'ईडब्ल्यूएस बंद करू नका ते चालू ठेवणे गरजेचे आहे, सर्व जाती धर्माच्या मुलींना मोफत म्हणजे मोफत शिक्षण द्या त्यात अटी, शर्ती ठेवू नका. सगेसोयरे बाबत ज्या हरकती प्राप्त झाल्या आहेत त्याबाबत शासनाने बघावे, आम्हाला आरक्षण द्या. येत्या काळात अंतरवाली सराटीत जे आंदोलन चालू आहे त्याला 29 ऑगस्ट रोजी एक वर्ष होत आहे. या दिवशी समाज बांधवांना बोलावून विधानसभा निवडणुकीत उभे राहायचे का पाडायचे? याचा निर्णय घेतला जाईल.' असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

'प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांची जनजागृती यात्रा सुरु आहे, तो त्यांचा अधिकार आहे. ते नेहमी वंचितांसाठी काम करतात ते त्यांचा नक्की विचार करतील. त्यांच्या बाबतीत मी नाराज नाही, त्यांनी गरजवंताच्या पाठीशी उभे राहावे.', असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

शासनाने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण, भाऊ आदी योजनाची घोषणा केली असल्याची टीका जरांगे यांनी केली. याशिवाय 20 ते 27 ऑगस्ट दरम्यान राज्यातील सर्व इच्छुकांनी यावे, आपल्याला सर्व जातींची मोट बांधायची आहे यासाठी उपस्थित राहा, असे आवाहन जरांगे यांनी यावेळी केले.

13 ते 20 ऑगस्ट दरम्यान बैठका घेणार आहोत. राज्यातील मराठा बांधवांनी आपापल्या भागाचा डेटा तयार ठेवावा, निवडणूकीची तयारी करावी, सगळ्या समाजाचा डेटा तयार ठेवावा, इच्छुकांनी सुद्धा बैठकीला यावे. आपण जर निवडणूक लढवू म्हटलं तर युतीवाले खुश होतायत, निवडणूक लढवली नाही तर महाविकास आघाडीवाले खुश होतात. 29 ऑगस्टला संपूर्ण राज्यातील मराठ्यांची बैठक घेऊन विधानसभा निवडणूक लढवायची की नाही? हे ठरवणार. या दिवशी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होणार आहे, असेही जरांगे पाटील म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT