Manoj Jarange Patil Criticise Congress Leader Nana patole-Vijay Wadettiwar Sarkarnama
मराठवाडा

Manoj jarange patil : लोकसभा निवडणुकीतील मदत काँग्रेस विसरली, विजय वडेट्टीवार, नाना पटोले जरांगे पाटलांच्या निशाण्यावर

Manoj Jarange Patil V/S Manoj Jarange Patil : केवळ मराठवाडाच नाही तर राज्यभरात काँग्रेस पक्षाचे एकूण 13 खासदार लोकसभेत निवडून गेले. मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका महायुतीला बसला होता.

Jagdish Pansare

  1. मनोज जरांगे पाटलांनी काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार आणि नाना पटोले यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली.

  2. त्यांनी लोकसभा निवडणुकीत दिलेली मदत काँग्रेस विसरल्याचा आरोप करत मराठा समाजाशी अन्याय झाल्याचे म्हटले.

  3. जरांगे पाटलांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि मराठा आंदोलन यांच्यातील तणाव पुन्हा उफाळून आला आहे.

Congress News : मराठा आरक्षणाचे आंदोलन आणि मुद्दा मराठवाडा आणि राज्यात तापला असतानाच 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत मराठा समाजाने काँग्रेस महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. सत्ताधारी पक्षाचे उमेदवार पाडा, असा संदेशच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. याचा सर्वाधिक फायदा राज्यात काँग्रेस पक्षाला झाला. मराठवाड्यात तीन आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे तेरा खासदार निवडून आले. या विजयाचे श्रेय देखील काँग्रेस नेत्यांनी मराठा समाजाला दिले.

परंतु लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा राज्यात सफाया झाला आणि काँग्रेसची (Congress) भूमिका बदलली. नाना पटोले, विजय वड्डेटीवार या राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली. पटोले सध्या या विषयावर फारसे बोलत नसले तरी विजय वडेट्टीवार जाहीरपणे मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करत काढलेल्या जीआर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध करत आहेत.

काँग्रेस लोकसभेला केलेली मदत दिलेला पाठिंबा विसरली, त्याची परफेड मराठा आरक्षणाला विरोधातून केली जात आहे का? असा संताप मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. त्यामुळे काँग्रेस आणि त्या पक्षाचे राज्यातील बडे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या निशाण्यावर असल्याचे बोलले जाते. वडेट्टीवार यांच्या जरांगे पाटील उघडपणे टीका करत आहेत. राहूल गांधी यांचे नाव घेत जरांगे पाटील यांनी त्यांच्या सांगण्यावरूनच काँग्रेसचे राज्यातील नेते मराठा आरक्षणाला विरोध करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसला धडा शिकवण्याचा इशाराही जरांगे पाटील सातत्याने देत आहेत. मराठवाड्यातील आठ पैकी तीन लोकसभेच्या जागा या काँग्रेस पक्षाने जिंकल्या आहेत. लातूर, नांदेड आणि मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या जालना लोकसभेची जागा काँग्रेस महाविकास आघाडीच्या डाॅ. कल्याण काळे यांनी मोठ्या फरकाने जिंकली. लातूरमध्ये डाॅ. शिवाजी काळगे, तर नांदेडमध्ये वंसतराव चव्हाण आणि त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे चिरंजीव रविंद्र चव्हाण हे ही विजयी झाले.

केवळ मराठवाडाच नाही तर राज्यभरात काँग्रेस पक्षाचे एकूण 13 खासदार लोकसभेत निवडून गेले. मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका महायुतीला बसला होता. सरकारविरोधातील वातावरणात महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा फायदा झाला होता. राष्ट्रवादी-शिवसेनेने मराठा आरक्षणाला किंवा हैदराबाद गॅझेटच्या जीआरवर मवाळ भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र लोकसभा निवडणुकीत केलेल्या मदतीची आठवण न ठेवता मराठा आरक्षणाला विरोध सुरू केल्याचा आरोप होत आहे.

पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला होता, परंतू कोणाचे हिसकावून ते दिले जाऊ नये अशी त्यांची भूमिका होती. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवामुळे त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागले. तेव्हापासून नाना पटोले हे काहीसे अलिप्त आहेत. तर विजय वडेट्टीवार सात्याने मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेत आहेत. याबद्दल मराठा समाज आणि आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे चांगलेच संतापले आहेत.

लोकसभा निवडणुकीत केलेल्या मदतीची आठवण करून देत, त्याचीच ही परतफेड आहे का? असा सवाल ते करत आहेत. तसेच येणाऱ्या सर्व निवडणुकीत काँग्रेस पक्षाला धडा शिकवण्याचा निर्धारही जरांगे पाटील यांनी केला आहे. याचा फटका जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका,पंचायतसमिती निवडणुकींमध्ये काँग्रेसला बसू शकतो. काँग्रेसला आता सुटी नाही, असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला आहे.

FAQs

1. मनोज जरांगे पाटलांनी कोणावर टीका केली?
त्यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यावर टीका केली.

2. त्यांनी काँग्रेसवर कोणता आरोप केला?
लोकसभा निवडणुकीतील मराठा समाजाच्या मदतीचा विसर काँग्रेसला पाडल्याचा आरोप त्यांनी केला.

3. हे वक्तव्य कुठे करण्यात आले?
हे वक्तव्य मराठा आरक्षण विषयावरील काँग्रेसच्या भूमिकेवर माध्यमांशी बोलताना केले.

4. काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया काय आहे?
काँग्रेसकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

5. या वक्तव्याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि मराठा समाजातील संबंधांमध्ये दरी वाढू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT