मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यात शेतकऱ्यांचा अपमान होऊ देणार नाही असा सरकारला कडक इशारा दिला.
शेतकऱ्यांच्या बांधावर कोणीही येऊन अपमान केला तर त्याचे परिणाम गंभीर असतील असे ते म्हणाले.
मराठवाड्यात शेतकरी चळवळीला नवा वेग मिळाल्याचे संकेत त्यांच्या भूमिकेतून दिसून आले.
Flood Affected Farmers News : राज्यात विशेषत: मराठवाड्यात अतिवृष्टी, ढगफुटी आणि पुराने अक्षरश: थैमान घातले आहे. दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांचे मराठवाड्यात दौरे सुरूच आहेत. मात्र या दौऱ्यांमधून माझ्या शेतकऱ्याला दिलासा, मदत देण्याऐवजी काही नेते बांधावर येऊन त्यांचाच अपमान करत असल्याचे पहायला मिळाले. अशा पद्धतीने बांधावर येऊन शेतकऱ्यांचा अपमान करणार असाल तर आम्ही शांत बसणार नाही. सगळ्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन तुमच्या विरोधात आवाज उठवू, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे प्रकृती बिघडल्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. उपचार घेतल्यानंतर आज ते रुग्णालयातून बाहेर आले. मराठवाड्यातील शेतकरी संकटात आहे, शासनाकडून त्याला तातडीची मदत मिळणे गरजेचे आहे. मंत्री, आमदार, खासदार मराठवाड्यात दौरे करत असताना आश्वासन देऊन माघारी फिरत आहेत. मात्र काही मंत्री आणि लोकप्रतिनिधी हे शेतकऱ्यांबद्दल संवेदना दाखवण्याऐवजी बांधावर येऊन त्यांचाच अपमान करत असल्याचे दिसून आले आहे.
जर हे असे घडणार असेल तर मग आम्हीही सर्व शेतकऱ्यांना (Affected Farmers) सोबत घेऊन सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. प्रकृती बरी नव्हती आता बरं वाटत आहे म्हणून पुन्हा बाहेर निघालो. डॉक्टरांनी मला विश्रांतीचा सल्ला दिला परंतु अशा परिस्थितीत थांबणे शक्य नाही म्हणून मी सोलापूर, मोहोळचा तातडीने दौरा करणार आहे, असेही जरांगे यांनी सांगितले.
मराठवाडा व राज्यातील इतर भागात पूरग्रस्त आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याची सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये स्पर्धा सुरू आहे. परंतु ही पाहणी करत असतानाच काही मंत्री शेतकऱ्यांना दरडावताना दिसतात. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे पाहणी करण्यासाठी आले असताना संतप्त शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला होता. यावेळी त्यांनी तातडीने मदत द्या, अशी मागणी केली.
यावर गिरीश महाजन यांनी 'मी सोबत पैसे घेऊन आलेलो नाही. नुकसानाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे' असे म्हणत त्रागा केला होता. याशिवाय इतर मंत्र्यांचाही पाहणी दौऱ्यातील शेतकऱ्यांसोबतचा अनुभव फारसा चांगला नसल्याचे दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर रुग्णालयातून बाहेर पडलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र व राज्याच्या इतर भागात पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार लवकरच ते सोलापूर आणि मोहोळ या भागांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. यावेळी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर उतरावे लागेल, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली. शेतकऱ्यांना तातडीची मदत आणि दिलासा मिळाला पाहिजे, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
Q1. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला काय इशारा दिला?
मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांचा अपमान होऊ दिला जाणार नाही, असा इशारा सरकारला दिला.
Q2. हा इशारा कुठल्या पार्श्वभूमीवर दिला गेला?
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दुर्लक्ष व अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे हा इशारा देण्यात आला.
Q3. जरांगे पाटलांच्या वक्तव्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे?
शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर समर्थन व्यक्त केले असून त्यांच्या चळवळीला वेग आला आहे.
Q4. सरकारने यावर अद्याप काही प्रतिक्रिया दिली आहे का?
सध्या अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र राजकीय वातावरण तापले आहे.
Q5. या इशाऱ्यामुळे पुढील आंदोलनाची शक्यता आहे का?
होय, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास मोठ्या आंदोलनाची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.