Nanded Rainfall News : नांदेड : जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी आणि मुसळधार पावसाने संपूर्ण नांदेड जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. रस्ते खचले, पूल वाहून गेले, शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. तर शहरी भागातही अतिक्रमणांमुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने घरांमध्ये पाणी शिरले. या सगळ्या गोष्टींवर तातडीने उपाय योजना करण्यासाठी मोठ्या निधीची गरज भासणार आहे. पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला आहे, मी देखील जिल्हाधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेतली असून लवकरच निधीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचे खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले.
अतिवृष्टीने नांदेड (Nanded) जिल्ह्यात अक्षरशः दाणादाण उडाली आहे. लोकांची घरे पडली अनेकांचे महापुरामध्ये बळी गेले, शेती खरडून निघाली तर खरीपाचे पीक पूर्णपणे वाया गेले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा देण्याची गरज आहे. महापूर आणि पावसाच्या पाण्याने रस्ते आणि जिल्ह्यातील पूलांची अवस्था देखील बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचले तर काही ठिकाणी पूल वाहून गेले. अशावेळी दळणवळण आणि मदतीसाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.
सोयाबीन, कापूस, हळद, ऊस या पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज आहे, या संदर्भात प्रशासकीय पातळीवर पंचनामे व माहिती घेण्याचे काम सुरूच आहे. नांदेड जिल्ह्याला पूर्व पदावर आणण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता भासणार आहे. या संदर्भातला संपूर्ण आढावा घेऊन राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचे, अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले.
यंदाच्या खरिप हंगामात मे ते ऑगस्ट या चारही महिन्यात नांदेड जिल्ह्याला प्रतिकूल निसर्गाचा जबर फटका बसला. जिल्ह्यातील 93 पैकी 88 मंडळात अतिवृष्टी झाल्याने पिकांची परिस्थिती होत्याचे नव्हते झाल्यासारखी आहे. रस्ते, पूल, घरे, पशुधनासह शेतीचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान पाहता जिल्ह्याला भरीव आर्थिक मदत मिळावी, अशी माझी मागणी आहे. नांदेड जिल्ह्यातील 53 महसुली मंडळांमध्ये किमान 3 किंवा त्याहून अधिक वेळा अतिवृष्टी झाली.
सोयाबीन व कपाशी या दोन प्रमुख पिकांसह तूर, मुगाच्या पिकाला अतिवृष्टीचा प्रचंड फटका बसला. हळद आणि ऊसाचेही काही प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्याच्या 7.56 लाख हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी बहुतांश शेतीचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे एनडीआरएफच्या निकषानुसार नांदेड जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी नुकसान भरपाईस पात्र ठरतील, अशी अपेक्षाही अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.