Government delegation to meet Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलन पुन्हा पेटले! 'चलो मुंबई'चा नारा; 'हे' 5 कडक नियम पाळण्याचे जरांगे पाटलांचे आवाहन

Manoj Jarange Patil Maratha Andolan latest news : मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून ‘चलो मुंबई’चा नारा दिला आहे. मराठा आंदोलनासाठी मराठा बांधवांना कोणते नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले, जाणून घ्या.

Rashmi Mane

मराठा आंदोलन पुन्हा एकदा चर्चेत आले असून, मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून ‘चलो मुंबई’चा नारा दिला आहे. मुंबईकडे निघणाऱ्या मराठा बांधवांनी शांतता, शिस्त आणि आंदोलनाची आचारसंहिता पाळावी, असे आवाहन त्यांनी केले. आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये, यावर त्यांनी विशेष भर दिला.

मराठा बांधवांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. “मराठ्यांना मान खाली घालावी लागेल असं वागू नका,” असे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले. सर्वांनी एकजुटीने आणि शिस्तीने पुढे जाण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

आंदोलनासाठी ठरवून दिलेल्या मार्गानेच सर्व वाहनांनी एकत्र प्रवास करावा, असे स्पष्ट निर्देश जरांगे पाटील यांनी दिले. कुणीही स्वतःहून मार्ग बदलू नये. प्रवासादरम्यान कोणालाही धक्का लागू नये किंवा इजा होऊ नये, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

आंदोलनात आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यापूर्वी काय घडले किंवा कोण काय बोलले, हे सर्व विसरून नव्या पद्धतीने शांततेत आंदोलन पुढे नेण्याचे त्यांनी सांगितले.

न्यायालयाबाबतही जरांगे पाटील यांनी आंदोलकांना महत्त्वाचा संदेश दिला. देशातील आणि राज्यातील गोरगरिबांच्या पाठीशी न्यायदेवता उभी असल्याचे सांगत त्यांनी न्यायालयाच्या नियमांचा आदर करण्याचे आवाहन केले. सरकारने मराठा समाजावर अन्याय केला असला तरी न्यायदेवता गोरगरिबांवर अन्याय करत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अंतरवाली सराटी येथून मुंबईपर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर आरक्षणाचा हक्क मिळवून परत येईपर्यंत संपूर्ण आंदोलन शांततेच्या मार्गानेच झाले पाहिजे, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. दगडफेक, जाळपोळ किंवा हिंसाचाराला आंदोलनात कोणतीही जागा नसल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांनी किंवा प्रशासनाने आंदोलकांना अडवण्यासाठी बॅरिकेड्स उभारले, तरी आंदोलकांनी हिंसाचार करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. “शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून आणि बुद्धिमत्तेने हे आंदोलन पुढे नेले पाहिजे,” असे ते म्हणाले. बॅरिकेड्स तोडण्याऐवजी रस्त्यावर शांततेत बसावे किंवा झोपावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, आंदोलनातील नियमांचे उल्लंघन झाल्यास आपण उपोषण आणि आंदोलन करणार नाही, असा थेट इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. त्यामुळे ‘चलो मुंबई’ आंदोलनात शिस्त आणि शांततेला सर्वाधिक महत्त्व दिले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकशाही आणि शांततेच्या मार्गानेच मराठा आरक्षणाचा हक्क मिळवण्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आंदोलनाची दिशा काय राहणार आणि मुंबईतील आंदोलन कसे आकार घेणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT