Manoj Jarange March to Mumbai Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange March to Mumbai : सरकारच्या दारात मरण आले तरी बेहत्तर; आजपासूनच उपोषणाची मनोज जरांगेंची घोषणा

सरकारनामा ब्यूरो

दिलीप दखने

Antarwali Sarati News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथून हजारोंच्या संख्येने समाजबांधव मुंबईच्या दिशेने निघण्यासाठी सज्ज झाले आहेत. तत्पूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला निघताना आरक्षण मिळण्यासाठी सरकारच्या दारात मरण आले तरी आता माघार नाही, आरक्षण घेऊनच परत येणार, असा निर्धार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

सात महिने झाले शासनाने आरक्षण (Maratha Reservation) प्रश्न सोडवला नाही, इतके नालायक सरकार पाहिले नाही. याआधी मुंबईला गेल्यावर आमरण उपोषण करणार होतो, परंतु आता अंतरवाली सराटी येथूनच आमरण उपोषण करीत मुंबईला जाणार असल्याची घोषणा जरांगे यांनी यावेळी केली. आरक्षणासाठी कोण विरोधात आहे, कोण सोबत आहे हे आता दिसणारच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत सात महिन्यांपासून चर्चा चालू आहे निर्णय होत नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. (Manoj Jarange-Patil Mumbai Morcha)

मुंबईला गेल्याशिवाय पर्याय नाही. 45 वर्षांपासून समाज लढतो आरक्षण मिळत नाही. आरक्षणासाठी राज्यात अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. ज्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना विचारा, याचे दु:ख किती आहे. हे सांगताना जरांगे यांना अश्रू अनावर झाले. आरक्षणासाठी ही टोकाची लढाई आहे, यात समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी अंतरवालीतून निघण्यापूर्वी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नोंदी सापडल्या तरी पण आरक्षण मिळत नाही, त्यामुळे आता छातीवर गोळ्या पडल्या तरी मागे हटणार नाही. आता सर्वांनी बाहेर पडा, घरात बसू नका. आरक्षण घेण्यासाठी मुंबईला चला, अशी हाकही जरांगे-पाटील यांनी दिली. लोकांचे बलिदान डोळ्यासमोर दिसत आहे, मुले मोठे अधिकारी झाले पाहिजेत, मुंबईवारीमध्ये जे मंत्री, आमदार सहभागी होतील ते समाज म्हणून असतील, असे जरांगे म्हणाले.

अंतरवाली सराटी सोडून निघालो की माघार नाही. लोक टप्प्याटप्प्याने सहभागी होणार आहेत. नोटीस, केसेस हेच काम सरकारला आता राहिले आहे. याला आम्ही घाबरत नाही. शासनाने भ्रमात ठेवले, तीन कोटी समाजबांधव मुंबईला येणार आहेत, प्रवास सुखरूप होणार, यासाठी नियोजन केले आहे. आंदोलन लोकांना दाखवण्यासाठी नाही, आरक्षण लढ्यासाठी आहे. मला समाजाचा अभिमान आहे. आतापर्यंत शासनास विनवण्या केल्या, आवाहन केले. काहीही झाले नाही. आता माघार नाही, असे मनोज जरांगे यांनी ठणकावून सांगितले.

अंतरवाली सराटी येथे रात्रीपासून मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाला आहे. सर्वांनी मुंबईला जायचे आहे तयारी करून आलो आहे, असे सांगितले. या सर्वांना भागातील गावाच्या लोकांनी नाष्टा, जेवण दिले. आता मुंबईला निघाले आहेत.

(Edited By - Rajanand More)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT