Maratha Samaj Georai meeting Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation : गेवराईत सकल मराठा समाजाने घेतला 'हा' मोठा निर्णय!

Datta Deshmukh

Maratha Reservation Agitation Beed News : मराठा समाजाला स्वतंत्र 10 टक्के आरक्षण, आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांची SIT चौकशीची घोषणा, विविध आरोप, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची थांबलेली प्रक्रिया या सगळ्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामधील सकल मराठा समाजाने गुरुवारी बैठक घेत एक मोठा निर्णय घेतला आहे.

सगेसोयरे अधिसुचनेची कायद्यात अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर व कुठल्याही सभेला जाणार नाही, असा ठराव सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. गेवराईत झालेल्या बैठकीला सभागृह समाज बांधवांच्या गर्दीने तुडूंब भरले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण द्यावे, या मागणीसाठी ऑगस्ट अखेरीस मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange) यांनी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे उपोषणाने सुरुवात केली. सप्टेंबर महिन्यात आंदोलकांवर पोलिसांच्या लाठीहल्ल्यानंतर राज्यभर आंदोलनाची धग पसरली. अंतरवालीत जरांगे पाटील यांची भव्य सभा झाली. त्यानंतर त्यांनी राज्यभर दौरेही केले. बीडच्या अंतिम इशारा सभेतून त्यांनी मुंबईला उपोषणासाठी जाण्याची घोषणा केली आणि त्यांनी मुंबईकडे कुच केल्यानंतर त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, वाशी (नवी मुंबई) येथे सरकारने सगेसोयरे अधिसुचना काढण्याबाबत आश्वासन दिल्यानंतर आंदोलक माघारी फिरले. मात्र, या अधिसुचनेचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी अधिवेशनाची तयारी नसल्याने पुन्हा जरांगे पाटील उपोषणाला बसले.

यादरम्यान मनोज जरांगे यांनी सरकारवर विशेषकरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत, जोरदार टीका केली. एवढच नाहीतर जरांगे अंतरवालीमधून थेट मुंबईत फडणवीसांच्या शासकीय निवास्थान सागर बंगल्याकडे जाण्यासही निघाले होते. या घटनेनंतर आणि फडणवीसांवर(Devendra Fadnavis) केलेल्या आरोपांमुळे राज्य सरकारने जरांगेच्या बोलण्यामागे कोणी तरी आहे आणि त्याचा शोध घेतला जाणार असल्याचे जाहीर केले. त्यासाठी एसआयटी नेमण्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी विधिमंडळात सांगितले.

एवढच नाहीतर आंतरवालीमधील उपोषणस्थळावरील मंडप काढण्याच्याही पोलिसांकडून हालचाली झाल्याचे दिसून आले. या सर्व प्रकारामुळे आता मराठा समाजात राज्य सरकारबद्दल रोष निर्माण झाला आहे. गुरुवारी गेवराईत झालेल्या बैठकीतून हे समोर आले.

राज्य सरकारने मराठा समाजावर 50 टक्क्याच्या वरती स्वतंत्र 10 टक्के आरक्षण दिले असून हे लादलेले आरक्षण आम्हाला नको, सगेसोयरे अधिसुचनेची अंमलबजावणी करुन सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, तसेच मराठा समाजाला ओबीसीतून जोपर्यंत आरक्षण देणार नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या स्टेजवर जाणार नाही. असे विविध 10 ठराव यावेळी बैठकीत घेण्यात आले.

याशिवाय आम्ही कोणत्याही पक्षाचे बांधिल नसून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहोत. त्यामुळे यापुढे देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षणाचा लढा लढला जाईल यासह विविध ठराव गेवराईतील सकल मराठा समाजाच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आले. आंदोलनाची पुढील दिशा देखील ठरविण्यात आली. व्यापारी व सामान्यांना त्रास होणारे आंदोलनही केले जाणार नाही, असे विविध १० ठराव या बैठकीत घेण्यात आले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT