Villagers stage a road blockade in Latur amid the ongoing Maratha reservation protest, demanding written assurances from the administration. Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी चिठ्ठी लिहित तरुणाने संपवलं जीवन; लातूरमध्ये संतापाचा उद्रेक, महामार्गावर चक्काजाम!

Latur Youth Death for Maratha Reservation : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुमराठा येथील सुनील विनायक बिराजदार या तरुणाने मंगळवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुनील बिराजदार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत, ‘मराठा समाजाच्या आरक्षणासाठी माझे जीवन संपवत आहे’, असा मजकूर लिहिल्याची माहिती समोर आली आहे.

Jagdish Patil

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले असून, आंदोलकांनी मुंबईकडे जाण्यासाठी तयार राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. अशातच लातूर जिल्ह्यातून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुमराठा येथील सुनील विनायक बिराजदार या तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुनील बिराजदार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत, ‘मराठा समाजाच्या आरक्षणासाठी माझे जीवन संपवत आहे’, असा मजकूर लिहिल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी विहिरीत शोध घेतला. त्यानंतर सुनील यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेनंतर सुमराठा आणि परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. मोड येथे उदगीर-लातूर महामार्गावर मृतदेह ठेवून चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

आंदोलकांनी प्रशासनासमोर दोन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. मृताच्या कुटुंबातील एका सदस्याला तातडीने शासकीय सेवेत सामावून घेण्याचे लेखी आश्वासन द्यावे, तसेच मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत प्रशासनाने लेखी निर्णय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

जोपर्यंत या दोन्ही मागण्यांबाबत प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि अंत्यविधी करणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, आंदोलकांशी चर्चा सुरू आहे.

एकीकडे अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना दुसरीकडे लातूरमध्ये घडलेल्या या घटनेने आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर लातूर जिल्ह्यातील वातावरण अधिकच तापले असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे आंदोलकांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT