bacchu kadu chhagan bhujbal manoj jarange patil
bacchu kadu chhagan bhujbal manoj jarange patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange : आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच बच्चू कडूंचं मोठं विधान,...म्हणून जरांगे अन् भुजबळांनी एकत्र यावं!

Chaitanya Machale

Manoj Jarange News : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिल्यानंतर आपले आरक्षण कमी होईल, अशी भीती ओबीसींमध्ये निर्माण झाली आहे. ही भीती काढून टाकण्यासाठी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांनी एकत्र यावे आणि दिल्लीसमोर लढा द्यावा, अशी अपेक्षा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली. यासाठी या दोन्ही नेत्यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरु केले होते. त्याची दखल घेत राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे. मात्र यामध्ये सगेसोयरेबाबत कोणताही उल्लेख नसल्याने जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केले होते. एका महिन्याच्या आत 13 जुलैपूर्वी याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने मंत्री शंभुराजे देसाई यांनी दिलेले आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी सुरू केलेले आपले उपोषण मागे घेतले आहे.

सर्वसाधारण एका वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जरांगे पाटील यांनी लढा उभारला आहे. अंतरवली सराटी मध्ये ज्यावेळी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला या घटनेनंतर जरांगे पाटील चांगलेच चर्चेत आले आहेत. राज्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यामध्ये आणि जरांगे पाटील यांच्यातील वैर सर्वांना परिचित आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. पण त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका भुजबळ यांनी घेतलेली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, असा शब्द दिला आहे. तर ओबीसीमधूनच मराठे आरक्षण घेणार, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. त्यामुळे इतर मागासवर्गीय समाजातील नागरिक नाराज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री बच्चू कडू यांनी जरांगे आणि भुजबळ या दोघांनी एकत्र यावे, अशी भूमिका घेतली आहे.

मराठा समाजाला आरक्षण दिल्यास आपल्यावर अन्याय होईल, अशी भीती ओबीसी समाजामध्ये आहे. ही भीती काढून टाकण्यासाठी या नेत्यांनी एकत्र येऊन दिल्लीसमोर लढा द्यावा, असे कडू यांनी म्हंटले आहे. यासाठी लवकरच जरांगे आणि भुजबळ यांची भेट घेणार असल्याचेही बच्चू कडू यांनी म्हंटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT