Devendra Fadnavis | Manoj Jarange Patil
Devendra Fadnavis | Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil News : जरांगे-पाटलांचा फडणवीसांना इशारा, मराठा समाजातील नेत्यांनाही सुनावलं

प्रशांत बर्दापूरकर

अंबाजोगाई (जि. बीड) : 14 मार्च | मराठा समाजाला आरक्षणासाठी ( Maratha Reservation ) लढणे व ते मिळवून देणे हेच एकमेव ध्येय आहे. राजकारण हा माझा मार्ग नाही. त्यामुळेच सरकारने सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करून आरक्षण द्यावे, अशी मागणी बुधवारी ( 13 मार्च ) मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनी येथे केली.

येथील साधना मंगल कार्यालयात बुधवारी रात्री मनोज जरांगे-पाटील यांची संवाद बैठक झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) म्हणाले, "ही आरक्षणाची लढाई समाजाच्या एकजुटीमुळे जवळ आली आहे. समाजाच्या बळावरच हा विषय अंतिम टप्प्यात आणला आहे," असे सांगून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांचा द्वेष करतात, असा आरोपही जरांगेंनी केला.

"सभागृहात नेते पक्षाला का बाप म्हणू लागले?"

"आमच्या तोंडून काही शब्द गेले असतील, तर दिलगिरी आम्ही व्यक्त केली. मात्र, सरकारने मागणीची पूर्तता केली नाही. सभागृहात नेते जातीला बाप म्हणायचे सोडून पक्षाला का बाप म्हणू लागले," अशा शब्दांत मराठा समाजातील नेत्यांना जरांगेंनी सुनावलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"मला अटक करायला हिंमत लागले"

"फडणवीसांनी आम्हाला छत्रपतींचे विचार शिकविण्याची गरज नाही. राज्यात आमच्या भावांनी आत्महत्या केल्या, आया-बहिणींना गोळ्या लागल्या याचे काय? उपोषण करून बघा मग कळेल काय असते ते. आम्हाला जेलच्या धमक्या देता काय? मला अटक करायला हिंमत लागते. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका," असा इशाराही जरांगेंनी फडणवीसांना दिला.

"इतरांना 'हा' नियम का नाही?"

"समाज हाच माझा परिवार आहे. करेक्ट कार्यक्रम कोण करते, ते बघू. माझा समाजही कार्यक्रम करीत असतो. रात्री दहा वाजेपर्यंतच कार्यक्रम घेण्यासाठी नियम आहेत म्हणे... तोही मराठा समाजासाठीच का? इतरांना हा नियम का नाही? मात्र, आपण हा नियम पाळणार आहे," असं जरांगेंनी स्पष्ट केले.

"...ही तर सभाच झाली"

दरम्यान, मंगल कार्यालयात रात्री उशिरा नऊ वाजता सभा असूनही समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती. हा जनसमुदाय बघून ही बैठक कसली, ही तर सभाच झाली, असे उद्गारही जरांगे यांनी काढले. येथील मराठा समाजाने काढलेले पत्रक पाहून याचा राज्यातील सर्व समाजाने आदर्श घेण्याचे आवाहन त्यांनी केले. "मी मतदार, सगेसोयरे हा अध्यादेश जोपर्यंत लागू होत नाही, तोपर्यंत पुढाऱ्यांनी आमच्या दारात येऊ नये", असे पत्रकात म्हटलं आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT