Raosaheb Danve - Bhagwat Karad Sarkarnama
मराठवाडा

Dr.Bhagwat Karad News : केंद्रातील दोन मंत्रीपद गमावल्याने मराठवाडा बॅकफुटवर !

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar news : लोकसभा निवडणुकीत देशपातळीवर भाजपचे अब की बार चौर सौ पार, आणि राज्यातील मिशन -45 फेल ठरले. याचा मोठा फटका महाराष्ट्र, विशेषतः मराठवाड्याला बसला आहे. राज्यात तीन आणि केंद्रात दोन मंत्री असल्याने मराठवाड्याची राजधानी असलेला संभाजीनगर जिल्हा वेगवान विकासाकडे वाटचाल करत होता. मात्र आठ पैकी केवळ एका लोकसभा मतदारसंघात महायुतीला यश मिळाले आणि सात ठिकाणी दारूण पराभव झाला. सत्ताधारी पक्षाचे यामुळे नुकसान तर झालेच पण मराठवाडा विकासाच्या बाबतीत बॅकफुटवर गेला.

राज्याच्या मंत्रीमंडळातील तीन आणि केंद्रातील दोन मंत्र्यांमुळे वाढपी आपला असेल तर ताटात बुंदी अधिक पडते यानूसार मराठवाड्याच्या वाट्याला केंद्राकडून काही ना काही अतिरिक्त मिळत होते. लोकसभेच्या जालना मतदारसंघातून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राहिलेले रावसाहेब दानवे पराभूत झाले. त्यामुळे त्यांच्या रुपाने केंद्रात मिळालेले एक राज्यमंत्री पद गेले. देशपातळीवर भाजपचे चार सौ पार फसले, स्वबळावर भाजपला बहुमत गाठता आले नाही. नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांच्यासह छोट्या-मोठ्या मित्र पक्षांचा टेकू घेऊन नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले.

सहाजिकच सत्तेत वाटेकरी वाढले आणि त्याचा फटका अनेक मंत्र्यांना बसला. दानवे निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे त्यांचे मंत्रीपद गेले. तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री असलेल्या डॉ. भागवत कराड यांना नव्या मंत्रीमंडळातून वगळण्यात आले. मित्रपक्षांना संधी द्यावी लागणार म्हणून कराड यांचा बळी दिल्याचे दिसते. शिवाय त्यांच्याकडे प्रभार असलेल्या मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश लोकसभा मतदारसंघात भाजपला अपयश आले. याचे खापर फोडत कराड यांना मंत्रीमंडळातून डिच्चू देण्यात आला.

डॉ. भागवत कराड यांनी अर्थ राज्यमंत्री म्हणून चांगली कामगिरी केली होती. मंत्री म्हणून ते पास ठरत असले तरी संघटनात्मक पातळीवर त्यांना फारसे यश मिळाले नाही. कराड यांना राज्यसभेवरची संधी आणि त्यानंतरचे मंत्रीपद हे एका राजकीय खेळीतून दिले गेले होते. भाजपमध्ये पंकजा मुंडे यांचे पंख छाटण्याच्या राजकारणासाठी कराड यांना तेव्हा बळीचा बकरा करण्यात आले होते. हेतू साध्य झाल्यानंतर आता दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कराड यांच्याकडचे मंत्रीपदही काढून घेतले, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात होताना दिसते.

कराड यांची एप्रिल 2020 मध्ये राज्यसभेवर निवड झाली होती. तर 7 जुलै 2021 मध्ये त्यांना अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री करण्यात आले होते. 2 वर्ष अकरा महिने त्यांच्या मंत्रीपदाचा कार्यकाळ राहिला. कराड, दानवे यांचे मंत्रीपद गेल्याने मराठवाड्याचे सर्वाधिक नुकसान येणाऱ्या काळात होणार आहे. रावसाहेब दानवे सहाव्यांदा जालन्यातून निवडून आले असते तर त्यांना कॅबिनेट पदी बढती मिळण्याची शक्यता होती. जालना येथील प्रचार सभेत वरिष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) यांनी तसे संकेत दिले होते. परंतु दानवे यांचा पराभव झाला आणि ही संधी हुकली.

केंद्रात रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्या कार्यकाळात मराठवाड्यातील रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण, विद्युतीकरण, पीट लाईन, मुंबईला जाण्यासाठी नव्या रेल्वे गाड्या, मराठवाड्याला महाराष्ट्र व इतर राज्यांशी जोडणारे नवे रेल्वे मार्ग अशी अनेक कामे मार्गी लागली. वंदे भारत ट्रेन दानवे यांच्या प्रयत्नामुळेच जालन्याहून-मुंबईला जाण्यासाठी उपलब्ध होऊ शकली. एनडीच्या नव्या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या वाट्यालाच केवळ सहा मंत्रीपद आली आहेत. एकूणच याचा फटका राज्याला आणि मराठवाड्याला बसल्याशिवाय राहणार नाही.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT