Ambedkar-Thackeray Alliance News, Aurangabad
Ambedkar-Thackeray Alliance News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Vanchit Aghadi News: एमआयएमला सात महिन्यात सोडचिठ्ठी ; शिवसेनेशी आंबेडकरांची युती किती काळ टिकेल ?

सरकारनामा ब्युरो

Marathwada News : गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघाचे रुपांतर वंचित बहुजन आघाडीत केले. एक व्यापक दृष्टीकोन ठेवून समाजातील वंचित घटकांना सत्तेच्या सोपानात बसवण्याचा त्यांच्याय प्रयत्न होता. यासाठी त्यांनी एमआयएम (Aimim) पक्षाला सोबत घेतले आणि महाराष्ट्रात एक नवा राजकीय पर्याय निर्माण झाला. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत (Vanchit Aghadi) वंचित- एमआयएम आघाडीने अक्षरश: धुमाकूळ घातला.

राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाव परिणाम करु शकणारी आघाडी म्हणून या दोन पक्षाकडे पाहिले गेले. (Maharashtra) महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमच्या असदद्दोन ओवेसी यांच्या संयुक्त सभांना रेकाॅर्डब्रेक गर्दी जमायला लागली. लोकांना या आघाडीला अक्षरश डोक्यावर घेतले. विरोधकांना देखील या नव्या आघाडीने धडकी भरली. स्वतः प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) अकोला आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून लढले. तर एमआयएमने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात प्रस्थापित पक्षांना आव्हान दिले.

आंबेडकर-ओवेसींचे हे गारूड राज्यात चमत्कार घडवणार असे चित्र निर्माण झाले. पण या युतीचा सर्वाधिक फायदा झाला तो ओवेसींच्या एमआयएमला. प्रकाश आंबेडकरांचा शब्द प्रमाण मानणाऱ्या दलित, वंचित, आदिवासी व अठरापगड जातीच्या लोकांनी वंचित-एमआयएमच्या आघाडीला भरभरून मतदान केले. पण एमआयएमकडे झुकलेला मुस्लिम मतदार मात्र आंबेडकरांच्या पाठीशी उभा राहिला नाही. अकोला, सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून आंबेडकरांचा पराभव झाला आणि तिथेच या आघाडीचे भवितव्य धोक्यात आले.

मार्च २०१९ मध्ये झालेली वंचित बहुजन-एमआयएम या दोन पक्षांची आघाडी आॅक्टोबर मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच संपुष्टात आली. अवघ्या सात महिन्यात वंचित-एमआयएमची फारकत झाली. त्यानंतर आता अडीच-तीन वर्षांनी प्रकाश आंबेडकरांनी नवा साथीदार शोधला आहे. पक्षात मोठ्या प्रमाणात बंड होऊन मुख्यमंत्रीपद गमावलेल्या उद्धव ठाकरे यांनी आधी संभाजी ब्रिगेड आणि आता प्रकाश आंबेडकरांच्या वंचितशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी, बोलणी आणि चर्चांचे सत्र सुरू आहे.

कोणत्याही क्षणी या दोन पक्षांच्या नव्या युतीची घोषणा केली जावू शकते. परंतु प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या आधीच्या भारिप आणि आताच्या वंचित आघाडीचा राजकीय प्रवास पाहता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होवू घातलेल्या नव्या युतीचे भवितव्य काय असेल? ती किती काळ टिकेल? याबद्दल प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हापासून या आघाडीचा भाग होता यावा यासाठी आंबेडकराचे प्रयत्न सुरू होते. परंतु सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीचा होणारा संभाव्य विरोध पाहता काॅंग्रेसने आंबेडकरांना दूरच ठेवले. शिवसेनेने तेव्हा कुठलीच भूमिका घेतली नाही.

परंतु एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत ४० आमदार आणि १२ खासदार पळवताच ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकली. मुख्यमंत्रीपद, सत्ता गेली, नेत्यांच्या मागे ईडी लागली. त्यामुळे चोहोबाजूंनी संकटात सापडलेल्या ठाकरेंनी आधी संभाजी ब्रिगेडशी युती केली. ब्रिगेडला असलेल्या मर्यादा पाहता पुन्हा भरारी घेण्यासाठी ठाकरेंना वोटबॅंक असलेल्या पक्षाची गरज होती. ती प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत जाण्याची भागवली जाणार आहे. आता महाविकास आघाडीच्या तीन पक्षात वंचितच्या रुपाने चौथा वाटेकरी वाढण्याची शक्यता आहे.

भाजपला विरोध म्हणून राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसने व्यापक भूमिका घेत ठाकरे-आंबेडकर युतीला विरोध केला नाही, पण स्वतःला त्यांच्या बंधनात देखील अडकवून घेतले नाही. त्यामुळे वंचित- ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ज्या काही वाटाघाटी होतील त्या फक्त शिवसेनेपुरत्याच मर्यादित असणार आहे. वंचितसोबत जाण्याचा ठाकरेंना फायदा होणार का? तर निश्चित होणार. पण तो दिर्घकाळ असेल का? हे मात्र आताच सांगता येणार नाही. प्रकाश आंबेडकरांची मर्जी सांभाळणे ठाकरेंना जमले तर निश्चितच ही युती औटघटकेची ठरणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT