Mp Imtaiz Jalil, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Parbhani AIMIM News : 'एमआयएम'चे काँग्रेसी सूर ; इम्तियाज जलील यांनी फोडले नव्या वादाला तोंड

Prasad Shivaji Joshi

Parbhani News : : देशाच्या संसदेत भाजपचे तीनशे खासदार असले तरी एमआयएमचे आम्ही दोन खासदार त्यांच्यावर वरचढ आहोत. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर बोलताना एमआयएमचे खासदार असदूद्दीन ओवेसी यांनी ठामपणे सांगितले की, या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वात मोठे महापुरुष आहेत, असे बोलल्यामुळे त्यांना खूप त्रास झाला कारण ते सावरकर यांना महापुरुष मानतात. आम्ही मात्र अशा मंडळींना कधीच आदर्श मानू शकत नाही, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

भाजपला आदर्श असणारे सावरकर यांना आम्ही कधीच आदर्श मानत नाही, असे विधान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले. परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे आयोजित संविधान गौरव कार्यक्रमात त्यांनी केलेल्या या विधानामुळे त्यांच्या तोंडून काँगेसी सूर निघाल्याचे बोलले जात आहे.

संविधानाचा गौरव वाढवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी 2024 मध्ये मोदींना हरवणे आवश्यक आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येत झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे त्यांचे मनोबल खूप वाढले आहे. काहीजण असे सांगत आहेत की देशात आमचे राज्य आले आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की जोपर्यत देश आहे, तोपर्यंत केवळ संविधानाचेच राज्य असेल. देशाचे संविधान बदलण्याचा हा डाव आहे. मात्र आम्ही हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. दलित समाजाने साथ दिल्यामुळेच मी संसदेत पोहोचू शकलो, असेही इम्तियाज जलील (Imtiyaj Jalil) यांनी सांगितले.

देशातील जनतेचा बोलण्याचा अधिकार काढून घेतला जात आहे. जर काही बोलले तर ईडी, इन्कम टॅक्सचा वापर केला जात आहे, पोलिसांना गुलाम केले जात आहे. पण आम्ही बोलू शकतो कारण, आमच्या मागे पुढे काहीच नाही. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते आमचे काहीच करू शकत नाहीत, असे आव्हानही इम्तियाज यांनी सत्ताधारी भाजपला दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019 च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार आलमगीर खान (alamgir Khan) हे वंचित आघाडीकडून निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांनी एक लाखाहून अधिक मते मिळवली होती. परंतु, यावेळी एमआयएम वंचित बहुजन आघाडीसोबत नसल्याने एमआयएमला स्वतंत्रपणे लढावे लागणार आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील कार्यक्रमाना उपस्थित राहून वातावरण निर्माण करण्याचा आणि गेल्यावेळी वंचितमुळे पदरात पडलेली मते पुन्हा मिळावी, यासाठी एमआयएमकडून प्रयत्न केले जात असल्याचे बोलले जाते.

परभणी जिल्ह्यातील मुस्लीम नेते शिवसेना शिंदे गटासोबत गेल्याने मुस्लीम मते आकर्षित करण्यासाठी वादग्रस्त विधाने करण्याचा प्रयत्न एमआयएमकडून केला जात आहे, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

(Edited by : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT