Nana Patole, Tanaji Sawant Latest News
Nana Patole, Tanaji Sawant Latest News Sarkarnama
मराठवाडा

मंत्री सावंतांची तत्काळ हकालपट्टी करा...

सरकारनामा ब्यूरो

Maratha Reservation : शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणा (Marath Reservation) संदर्भात वादग्रस्त विधान केल्याने राज्यातील मराठा समाज संतप्त झाला आहे. उस्मानाबाद येथील हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रे दरम्यान बोलतांना सावंत (Tanaji Sawant) यांची जीभ घसरली. त्यामुळे त्यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली. यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सावंत यांच्या विधानावर खुलासा करावा व बेताल वक्तव्य करणाऱ्या तानाजी सावंत यांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. (Nana Patole, Tanaji Sawant Latest News)

पटोले म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी होत आहे. आरक्षण मिळावे यासाठी राज्यातून विविध संघटना, राजकीय पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी सरकारी व न्यायालयीन पातळीवरही लढा सुरु असून महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केल्याचे नाना पटोलेंनी सांगितले. तसेच 2014 ला आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र त्यानंतर आलेल्या फडणवीस सरकारच्या निष्क्रियतेमुळेच मराठा आरक्षण संपुष्टात आले. आजही मराठी आरक्षणासाठी प्रयत्न सुरु असताना राज्यातील एक मंत्री अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करतो हे अत्यंत निषेधार्ह आहे, अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे बोलतांना नाना पटोले म्हणाले की, सावंत हे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत. नुकतेच त्यांनी प्रसिद्धी माध्यमांबद्दलही वादग्रस्त विधान केले होते. या महोदयांनी याआधीही महाराष्ट्राला विकत घेण्याची भाषा केली होती. त्यांचे विधान सत्तेचा माज दाखवते पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, सत्तेची मस्ती कशी उतरवायची हे त्यांना चांगले माहीत असल्याचे पटोलेंनी म्हटले आहे. सावंतांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागावी आणि शिंदे-फडणवीस यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी पटोलेंनी केली.

दरम्यान, सावंतांनी उस्मानाबाद येथील हिंदू गर्व गर्जना यात्रेत आक्रमक भाषण करण्याच्या उत्साहात त्यांनी आम्ही सत्तेवर येताच मराठा समाजाला आरक्षणाची खाज कशी सुटली,असे आक्षेपाहार्य विधान केले होते. त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. यानंतर सावंतांना माफी देखील मागावी लागली आहे. या सगळ्या प्रकारावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. आता पटोलेंनी तर त्यांचा राजीनामाच घ्यावा, अशी मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT