Sanjay Shirsat On Uddhav Thackeray News Sarkarnama
मराठवाडा

MLA Sanjay Shirsat News : राम मंदिराचे स्वप्न साकार होत असताना ठाकरेंनी मिठाचा खडा टाकू नये...

Jagdish Pansare

Shivsena News : अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. संपूर्ण देश ज्या राम मंदिरासाठी अनेक वर्षांपासून भांडत होता, ते स्वप्न साकार होत आहे. परंतु, हे स्वप्न साकार होत असल्याचे पाहून काहीजणांनी दुधात जसा मिठाचा खडा टाकावा, त्यापद्धतीचे वक्तव्य करायला सुरुवात केली आहे, अशी टीका शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat News) यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

राम मंदिर तुमची प्रॉपर्टी आहे का ? तुमच्या नावाचा सातबारा आहे का ? याला निमंत्रण आहे, त्याला नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित करून जो चांगला कार्यक्रम आहे, त्याला गालबोट लावले जात आहे, असा आरोप शिरसाट यांनी केला आहे.

ज्याला कोणाला रामलल्लाचे दर्शन घ्यायचे आहे त्याला कोणी अडवलेले नाही किंवा जाण्यापासून रोखलेले नाही. (Shivsena) परंतु, प्रत्येक ठिकाणी आपले वर्चस्व किंवा आपले प्रतिनिधीत्व यासाठी जो काही अट्टाहास लावला आहे तो योग्य नाही. म्हणून मी सर्वांना विनंती करतोय, अनेक वर्षांनंतर मिळालेल्या या आनंदात विघ्न आणण्याचा प्रयत्न करु नका, असा टोला संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनावरून उद्धव ठाकरे यांनी काल भाजपवर रामलल्ला तुमची प्रायव्हेट प्राॅपर्टी आहे का? अशा शब्दात टीका केली होती. त्याला आज शिंदेसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले. संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे, राऊत, अंबादास दानवे यांच्यावर तोंडसुख घेतले. आम्ही येत्या लोकसभेत 45 चा आकडा पार करणार असल्याचे म्हटल्यावर, उबाठा गटाचे जे सर्वेसर्वा (संजय राऊत) आहेत त्यांच्या पोटात दुखायला लागले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राऊत तुम्ही वाचणार नाहीत..

एकनाथ शिंदे आणि अजितदादाच्या कुबड्या घेवून भाजप पुढे चालले आहे, असे वक्तव्य राऊत यांनी केले होते. त्यावर, मग हे किती जागा लढवणार? यांच्या तर आघाडी होण्याबाबतच प्रश्नचिन्ह आहे. जर आघाडी झाली तर हेही शरद पवार आणि कॉंग्रेसचा टेकू घेवूनच लढणार आहेत. हे म्हणजे `स्वतःचं ठेवायचं झाकून अन् इतरांचं पाहायचं वाकून`, अशी गत असल्याची टीका शिरसाट यांनी केली.

बडगुजरच्या प्रकरणातही हे त्याला वाचवायला गेले नव्हते, तर यांनी जो गोंधळ केला आहे तो निस्तरण्यासाठी नाशिकला गेले होते. त्यामुळे संजय राऊत तुम्ही वाचणार नाहीत, हे निश्चित आहे. जोपर्यंत उबाठा गट डुबणार नाही तोपर्यंत त्यांना चैन पडणार नाही. त्यांनी उबाठा गट संपवण्याची सुपारी घेतली आहे. त्यांना सल्ला आहे की, त्यांना संपवून तुमच्या मनाला शांती मिळणार नाही. जे काही राहिलं आहे, ते वाचवण्याचा प्रयत्न करा. नाहीतर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही, असा टोलाही शिरसाट यांनी राऊत यांना लगावला.

छोट्या गोष्टीचे राजकारण करू नका...

अंबादास दानवे यांनी 31 डिसेंबरला उशीरापर्यंत दारू दुकाने ठेवण्याबाबत सरकारवर टीका केली होती. 31 डिसेंबरला उशीरापर्यंत दारुचे दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय जो घेतला तो आत्ता दिसला का ? अडीच वर्षांत दिसला नाही का? अनेक वर्षांपासून हा निर्णय घेतला जातो. अनेक लोक वर्षांचा शेवट म्हणून आपापल्या घरी आनंदोत्सव साजरा करतात.

दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी कोणालाच रस्त्यावर धिंगाणा घालण्याची परवानगी दिलेली नाही. कोणीही गैरकृत्य करणार नाही, अशी व्यवस्था पोलिसांकडून केली जाते. म्हणून अशा छोट्या गोष्टींवर राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये, असे म्हणत शिरसाट यांनी अंबादास दानवेंना सुनावले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT