MP Imtiaz Jalil News Sarkarnama
मराठवाडा

MP Imtiaz Jaleel News : ठेवीदारांच्या पैशासाठी इम्तियाज यांचा `थाळीनाद`..

सरकारनामा ब्युरो

Aurangabad Political News : मराठवाड्यासह राज्यात छत्रपती संभाजीनगरातील आदर्श पतसंस्थेतील घोटाळ्याची चर्चा आहे. दोनशे कोटीहून अधिकच्या ठेवी परत मिळवण्यासाठी ठेवीदारांचा संघर्ष सुरू आहे. (Adarsh Patsanstha Scam News) खासदार इम्तियाज जलील यांनी ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्याची शपथ घेतली असून सहकार, पोलिस आणि राज्य सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आंदोलन करत आहेत. पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा, धरणे आंदोलन यानंतर आता उपनिंबधक कार्यालयावर थाळीनाद करत इम्तियाज यांनी लक्ष वेधले आहे.

शेकडो ठेवीदारांच्या उपस्थितीत इम्तियाज यांनी उपनिबंधक कार्यालयावर धडक देत थाळीनाद केला. (AIMIM) झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आणि आदर्श पतसंस्थेच्या संचालकांच्या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सहकार विभागाच्या संबंधित अधिकारी, लेखापरीक्षकांवर कारवाई करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (Imtiaz Jalil) आपल्याच संस्थांना नियमबाह्यपणे कर्ज वाटप करत दोनशे कोटीहून अधिकचा घोटाळा आदर्श पतसंस्थेत झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आणि ठेवीदार सैरभर झाले.

आयुष्यभराच्या कष्टाची कमाई एकदिवसात होत्याची नव्हती झाल्याने आतापर्यंत दोन ठेवीदारांनी आत्महत्या केली, तर आठ जणांचा या तणावातून मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय. (Marathwada) या विषयावर कुठलाही राजकीय पक्ष, नेता पुढे येत नसतांना इम्तियाज जलील यांनी ठेवीदारांसाठी धाव घेतली. पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला, त्यानंतर आदर्शचा अध्यक्ष अंबादास मानकापे, त्याचा मुलगा आणि काही संचालकांना पोलिसांनी अटक केली. या संपुर्ण घोटाळ्याची चौकशी एसआयटी मार्फत करण्याचा निर्णय झाला. पतसंस्थेवर प्रशासक नेमूण अध्यक्ष व इतर संचालकांच्या संपत्तीवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू झाली.

परंतु ही वेळकाढू प्रक्रिया असल्याने ठेवीदारांच्या संयमाचा बांध फुटत आहे. या लोकांना धीर देत पोलिस, प्रशासन, सहकार विभागाशी लढा देण्याची रणनिती इम्तियाज जलील यांनी आखली आहे. घोटाळा करणाऱ्यांना पोलिस विभागातील काही अधिकारी पाठीशी घालत आहे, त्यांना पळवाटा सांगत आहेत, असा आरोप देखील इम्तियाज जलील यांनी केला होता. या शिवाय ज्या सहकार विभागाच्या नाकावर टिच्चून मानकापे आणि त्याच्या संचालकांनी पतसंस्थेत घोटाळा केला, ते अधिकारी, लेखापरीक्षक मात्र नामानिराळे आहेत.

त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका घेत इम्तियाज यांनी आजचे थाळीनाद आंदोलन केले. राज्यातील सहकारी बॅंका आणि पतसंस्थांमधील ठेवींची हमी राज्य सरकारने घ्यावी, अशी मागणी देखील इम्तियाज जलील यांनी विधीमंडळ अधिवेशना दरम्यान केली होती. जर सरकार ती घेणार नसेल तर लोकांनी आपापल्या ठेवी सहकारी बॅंका आणि पतसंस्थांमधून काढून घ्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले होते. एवढेच नाही, तर ठेवीदारांचे पैसे मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, अशी शपथच इम्तियाज जलील यांनी घेतली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT