Parbhani News, 27 Jul : महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही वर्षात कमालीचे बदलले आहे. कोण, कधी, कुठे आणि कोणत्या पक्षात असेल? याचा भरवसा राहिलेला नाही. नुकत्याच झालेल्या ऑपरेशन टायगरनंतर मराठवाड्यासह राज्यातील सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यामुळे हे खासदार आपापल्या मतदारसंघात ट्रोलही झाले. सामान्य मतदारांचा रोष त्यांना पत्करावा लागला.
मराठवाड्यातील परभणीचे खासदार संजय जाधव, धाराशीवचे ओमराजे निंबाळकर, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर या तिघांनी पक्ष सोडला. पण उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणार नाही, अशी भूमिका घेतली. राजकीय अपरिहार्यता म्हणून पक्षांतराचा निर्णय आपण घेतला असा या तीनही खासदारांचा सूर होता.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणार नाही या त्यांच्या निर्णयाचे कौतुकही झाले. पण पक्ष सोडल्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे हे काही ज्यांचे नेतृत्व या खासदारांनी नव्याने स्वीकारले आहे, त्यांना रुचले नाही. परिणामी खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारी पोस्ट डिलिट करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली.
आज उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून जाधव यांनी शुभेच्छा देत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. शुभेच्छा देत पक्ष बदलला असला तरी आपल्या निष्ठा उद्धव ठाकरे यांच्याशी कायम असल्याचे त्यांनी यातून दाखवून दिले होते. जाधव यांनी दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाची चर्चा परभणी जिल्ह्याच्या राजकारणात होऊ लागली.
पण बहुदा शिवसेनेत प्रवेश केलेल्या आपल्या या खासदारांचे उद्धव ठाकरे प्रेम नव्या नेतृत्वाला खटकले आणि वरून आदेश येताच जाधव यांनी ठाकरे यांना शुभेच्छा देणारी पोस्ट हटवली. पक्ष बदलानंतर अशा प्रकारे उघडपणे उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यामुळे मतदारसंघात संभ्रम निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आल्यानंतर ही पोस्ट हटवण्यात आल्याचे बोलले जाते. पक्ष नेतृत्वाकडून संजय जाधव यांना तंबी देण्यात आल्याची चर्चाही सध्या जोरात सुरू आहे.
ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले परभणीचे खासदार संजय जाधव यांनी सकाळीच उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. राजकीय भूमिका बदलल्यानंतरही जाधव यांनी ठाकरे यांच्याविषयी व्यक्त केलेला आदर आणि शुभेच्छांचा संदेश हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला गेला.
मतदारसंघाच्या विकासासाठी सत्ताधारी गटासोबत जाण्याचा निर्णय घेत खासदार जाधव यांनी ठाकरे गटाला रामराम करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या सोबत ठाकरे गटातील आणखी पाच खासदारांनीही शिंदे गटाची वाट धरली होती. या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी जाधव यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली होती.
मात्र, या संपूर्ण राजकीय संघर्षात खासदार जाधव यांनी उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबियांविषयी कधीही आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही. उलट, परभणीत कार्यकर्त्यांनीही ठाकरे कुटुंबियांबद्दल अपशब्द वापरू नयेत, अशी भूमिका सार्वजनिकरीत्या मांडली होती. त्यांच्या या भूमिकेचे कौतुकही झाले. पण खासदार बंडू बॉस यांचे हे ठाकरे प्रेम आता त्यांच्या अंगलट आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.