Ashok Chavan, Devendra Fadnavis  Sarkarnama
मराठवाडा

Nanded Loksabha Constituency : 'फडणवीसांनी काही सांगितलं अन् मी ऐकलं नाही असं कधीच झालं नाही'; चव्हाण यांचे मोठे विधान !

Jagdish Pansare

Nanded News : मी आणि प्रताप पाटील चिखलीकर मध्यंतरीचा काही काळ सोडला तर एकत्रं काम केलेलं आहे. त्यामुळे चिखलीकरांच्या प्रचाराला अशोक चव्हाण कसे? याचे सगळ्यांना आश्चर्य वाटतं असेल. पण हे सगळं घडवून आणलं ते फडणवीसांनी असे म्हणत खासदार अशोक चव्हाण यांनी महायुतीच्या सभेत धमाल उडवून दिली. नांदेड लोकसभा मतदारसंघातून प्रताप पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज आज मोठ्या शक्तिप्रदर्शनात दाखल करण्यात आला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis),भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ.भागवत कराड यांच्यासह महायुतीतील शिवसेना, राष्ट्रवादी व इतर मित्रपक्षांचे नेते चिखलीकरांच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या मेळाव्यात अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात अनेकांना चिमटे काढत जोरदार टोलेबाजी केली. भाषणाच्या सुरुवातीलाच चिखलीकरांच्या प्रचाराला अशोक चव्हाण, आश्चर्य वाटतयं ना, म्हणत चव्हाणांनी फिरकी घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पण हे सगळं घडवून आणलं ते फडणवीसांनी.पण तुम्हाला माहीत नाही मधला काही काळ सोडला तर आम्ही सोबत काम केलेलं आहे.आज जे घडलंय ते फडणवीसांमुळेच! मी सत्तेत असताना 'देवेंद्र फडणवीसांनी मला काही सांगितलं अन् मी ऐकलं नाही असं कधीच झालं नाही'. मी विरोधात असताना फडणवीसांना काही मागितलं आणि त्यांनी दिलं नाही, असं कधी झालं नाही, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी फडणवीसांचे कौतुक केले.

नांदेड (Nanded) जिल्ह्यात आता कोणाचा विरोधच राहिला नाही, सगळे इकडे आले आहेत. गळ्यात टाकायला दस्त्या संपल्या आहेत, रोज प्रवेश सुरू आहेत, थोडेफार राहिलेत. पण काँग्रेसमधील जे कोणी पदाधिकारी, कार्यकर्ते माझ्यासोबत भाजपमध्ये आले आहेत, त्या सगळ्यांना सन्मानाची वागणूक मिळेल. एकोप्याचे वातावरण टिकले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच भाजपमुळे नांदेडला पाच खासदार मिळाल्याचे चव्हाण म्हणाले.

या पुढील काळात जिल्ह्याचा विकास अधिक झपाट्याने होणार आहे. कारण ही मोदींची गॅरंटी आहे, गॅरंटी द्यायला माणूसही त्या उंचीचा लागतो. आता कोणीही गॅरंटी देऊ लागले आहे, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. महाविकास आघाडीची काल सभा झाली, त्यात विषय काय? तर फक्त अशोक चव्हाण.माझ्यावर बोलून काही होणार नाही, जिल्ह्याच्या विकासाचा काही अजेंडा तुमच्याकडे आहे का? असा सवाल चव्हाण यांनी केला.

(Edited by - Chaitanya Machale)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT