Devendra Fadanvis, Ajit Pawar and Eknath Shinde Latest News
Devendra Fadanvis, Ajit Pawar and Eknath Shinde Latest News  Sarkarnama
मराठवाडा

शेतकऱ्यांचा अंत न पाहता हेक्टरी ७५ हजारांची मदत करा...

अभय कुळकजाईकर : सरकारनामा

नांदेड : राज्यातील विविध भागात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. हे नैसर्गिक संकट मोठे असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत. हे सगळे थांबवायचे असेल तर विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पाहणी केली असली तरी आता याबाबतीत तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी (ता. ३0 जुलै) केली आहे. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांचा पवार यांनी दौरा केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Devendra Fadanvis, Ajit Pawar and Eknath Shinde Latest News)

पवार म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांचा अंत न पाहता हेक्टरी ७५ हजार रुपयांची मदत जाहीर करावी. त्याचबरोबर फळबागांच्या नुकसानीसंदर्भातही मदत करावी. पंचनामे आणि इतर नियमांवर बोट ठेऊन काम केले तर शेतकऱ्यांना काहीच मिळणार नाही. नुकसान एवढे मोठे आहे की पीक हाती येण्याची शक्यताही कमी आहे. घेतलेले कर्ज फेडण्याचीही कुवत राहिली नाही. त्यामुळे त्या दृष्टीने विचार केला पाहिजे, असे पवार म्हणाले.

राज्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी महिना झाला तरी मंत्रिमंडळ स्थापन केले नाही. अजूनही दिल्ली दौरे सुरू आहेत. मात्र, राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांचे पहिले कर्तव्य शेतकऱ्यांना मदतीचे आहे. मंत्रिमंडळ स्थापनेबाबत काय अडचण आहे, हे त्यांना माहिती. मंत्रिमंडळाचा विस्तार केला तर त्यांचेच काम हलके होईल, असा सल्लाही पवारांनी दिला.

राज्यपालांचे वक्तव्य संभ्रमात पडणारे

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून संभ्रमात पडणारे वक्तव्य केले जात आहे. महाराष्ट्राची फार मोठी परंपरा आहे. अखंड महाराष्ट्रासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करले आहे. इतिहासाच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. राज्यपाल हे पद फार महत्त्वाचे आणि मोठे आहे. वाद निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य करता कामा नये. मुख्यमंत्री शिंदे आमच्यासोबत मंत्री असताना सर्व विकासकामांना सहमती दर्शवत होते व आता मुख्यमंत्री झाले की सर्व विकासकामे रद्द करणे, स्थगिती देणे हे बरोबर नाही. विकासकामाची आणि जनतेची थट्टा नको, अशीही अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली.

‘पेशन्स’ ठेवले पाहिजेत

उपमुख्यमंत्री म्हणून मी यापूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केले. राज्याचा मुख्यमंत्री प्रथम असतो आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि इतर सहकारी म्हणून असतात. माझ्या काळात मी कुणाचा माईक ओढला नाही की कधी चिठ्ठी दिली नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी पेशन्स ठेवले पाहिजेत, असे पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. त्याचबरोबर हे माझे मत आहे त्यामुळे लगेचच तुम्ही सरकारला पेशन्सच नाहीत, असे म्हणत त्यांना जाऊन तुमचे मत काय हे विचारू नका, असा प्रतिप्रश्नही त्यांनी पत्रकारांना केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT