Congress Leader Balasaheb Thorat Sarkarnama
मराठवाडा

Congress : नामांतराला विरोध केला नाही, पक्षश्रेष्ठी थोरातांवर नाराज ; खुलासा मागितला..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, पण तत्पुर्वी शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत त्यांनी औरंगाबाद, उस्मानाबाद व नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. (Congress) विशेष म्हणजे आधी नामातंराला विरोध करणारे, हा विषयच आमच्या अजेंड्यावर नाही म्हणणारे, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी ठरावाला मात्र विरोध केला नाही. त्यामुळे जाता जाता उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.

ठरावाच्या वेळी मंत्रीमंडळ बैठकीत गप्प बसल्यामुळे आता काॅंग्रेसच्या नेत्यांवर दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची वक्रदृष्टी वळली आहे. (Aurangabad) विधीमंडळातील काॅंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत काॅंग्रेैसने नामांतराला विरोध का केला नाही ? याचा खुलासा करण्याचे आदेश थोरात यांना देण्यात आल्याची माहिती आहे.

राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले आहे. आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला १६४ मते मिळाली. तर महाविकास आघाडीकडे १०७ मते होती. शिंदेच्या बंडामुळे शिवसेनेला जोरदार हादरा बसला होता. ज्या नामांतराच्या विषयावर गेली अनेक वर्ष शिवसेना राजकारण करत आली आहे, त्या औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव मुख्यमंत्रीपद असतांना देखील बदलता आले नाही, तर याचा फटका येणाऱ्या निवडणुकीत बसू शकतो, म्हणून ठाकरे यांनी राजीनामा देण्यापुर्वी मंत्रीमंडळाच्या शेवटच्या बैठकीत हा विषय मार्गी लावला.

सरकार कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या शिवसेनेला आणखी अडचण नको म्हणून कदाचित राष्ट्रवादी, काॅंग्रेस या दोन्ही मित्रपक्षांनी नामांतराला विरोध केला नसावा, अशी चर्चा होती. परंतु आता विरोध न केल्याचे फटके नेत्यांना बसू लागले आहे. शिवाय या निर्णयामुळे राज्यातील विशेषतः अल्पसंख्याक समाज काॅंग्रेसवर कमालीचा नाराज झाला आहे. यामुळे राज्यभरात पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू झाले. मराठवाड्यात याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.

त्यामुळे काॅंग्रेसने हा विषय गांभीर्याने घेतला असून विधीमंडळातील नेते बाळासाहेब थोरात यांना दिल्लीहून या प्रकरणावर खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे अडीच वर्षाच्या काळात जेव्हा भाजपकडून नामांतराचा विषय काढला जात होता, अन् यावर काॅंग्रेसची भूमिका विचारली जात होती. तेव्हा बाळासाहेब थोरात नामंतराला आपला विरोध असल्याचे ठणकावून सांगत होते.

शहराचे नाव बदलून विकास होत असतो का ? नामांतर हा विषय आमच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. त्यामुळे जेव्हा हा विषय मंत्रीमंडळ बैठकीत येईल तेव्हा आम्ही त्याला कडाडून विरोध करू, अशी भूमिका देखील थोरांतानी यापुर्वी घेतली होती. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठींना ते काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT