Sundarrao Solanke Sarkarnama
मराठवाडा

Beed Politic's : ‘सुंदरराव सोळंकेंनंतर गेली 45 वर्षे बीडच्या एकाही मराठा नेत्याला कॅबिनेट मंत्रिपद किंवा पालकमंत्रिपद मिळाले नाही’

Maratha Leader Cabinet Minister Post : मंत्रिपदाबाबत निर्णय घेणारे शरद पवार, अजित पवार किंवा इतर नेत्यांनी कायमच ओबीसी किंवा मागासवर्गीयांना प्राधान्य दिले आहे. फुले-शाहू-आंबेडकर ही त्यांची विचारधारा आहे. राजकारण करताना सर्व समाजाला बरोबर घेऊन जायचे, हे त्यांचे धोरण आहे. त्यामुळे ते सातत्याने ओबीसी किंवा मागासवर्गीयांना प्राधान्य देत आले आहेत.

Vijaykumar Dudhale

Beed, 27 July : बीड जिल्ह्याच्या इतिहास पाहिला तर (स्व.) सुंदरराव सोळंके यांच्यानंतर गेली 45 वर्षे जिल्ह्यातील एकाही मराठा नेत्याला कॅबिनेट मंत्रिपद किंवा पालकमंत्रिपद मिळालेले नाही, ही एक वस्तुस्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो कणा आहे, ज्या समाजाने पक्षाला कायम ताकद दिली आहे. त्या मराठा समाजाचाही विचार झाला पाहिजे, असे आवाहन आमदार प्रकाश सोळंके यांनी पक्षनेतृत्वाला केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाबाबत संकेत दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी आपल्याला मंत्रिपद मिळत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. ते म्हणाले, बीडमधील मराठा समाज गेली 45 वर्षे कॅबिनेट मंत्री, पालकमंत्रिपदापासून वंचित राहिला आहे, हीपण एक वस्तुस्थिती आहे.

बीडमधील मराठा समाजाच्या (Maratha Comunity) आमदारांना अनेकदा राज्यमंत्री म्हणून संधी दिली गेली आहे. पण, राज्यमंत्रिपदाला जास्त काही अधिकार नसतात. त्या पदापर्यंत मराठा समाजाचा विचार झालेला आहे. विचारसरणीच्या आणि पक्षाच्या धोरणात मराठा समाज बीडमध्ये डावलला गेला आहे, ही वस्तुस्थिती आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रकाश सोळंके म्हणाले, मंत्रिपदाबाबत निर्णय घेणारे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा इतर नेते असतील त्यांनी कायमच ओबीसी किंवा मागासवर्गीयांना प्राधान्य दिले आहे. फुले-शाहू-आंबेडकर ही त्यांची विचारधारा आहे. राजकारण करताना सर्व समााजाला बरोबर घेऊन जायचे, हे त्यांचे धोरण आहे. त्यामुळे ते सातत्याने ओबीसी किंवा मागासवर्गीयांना प्राधान्य देत आले आहेत. त्यात काही चुकीचे आहे, असे मला वाटत नाही.

पक्षनेतृत्वाच्या मनात मंत्रिपदाबाबत आरक्षण असावं. कारण, गेल्या ४५ वर्षांंत मराठा समाजातील एकाही लोकप्रतिनिधीला कॅबिनेट मंत्री केले जात नाही. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद केले जात नाही. मराठा समाजाने फक्त निवडणुकीत तुमच्या पाठीशी उभं राहावं, अशी तुमची अपेक्षा आहे का, असा सवालही आमदार सोळंके यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले, मी ओबीसी समाजात जन्माला आलो असतो, तर कदाचित मला खूप मोठी संधी मिळाली असती. कुठल्या जातीत जन्म घ्यायचा, हे कुणाच्या हातात नाही. त्यामुळे विचार केल्यानंतर मला वाटतं की, आपण मराठा समाजात जन्माला आलो, हाच आपला दोष असावा, असं विचार केल्यावर कधी कधी वाटतं.

‘...अन्‌ माझा निर्णय योग्य ठरला’

मी मंत्रिपदाचा विचार करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो नाही. परिस्थितीचा विचार करून ही माजलगावची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी, पक्षाचा एक आमदार वाढावा, म्हणून ऐनवेळी निवडणुकीच्या निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि थोड्या मताच्या फरकाने जिंकलो. त्यामुळे माझा निर्णय योग्य ठरला, असेही प्रकाश सोळंके यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT