Pankaja Munde Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde News : पंकजा मुंडे भाजपऐवजी अपक्ष लढल्या असत्या तर विजय मिळाला असता; 'या' नेत्याचा खळबळजनक दावा

Sachin Waghmare

Beed News : लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसलेला असतानाच सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करीत असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. बीड लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत झाली.

मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव केला. या पराभवानंतर ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी जर पंकजा मुंडे (Pankaja Munde) या भाजपऐवजी अपक्ष उमेदवार असत्या तर त्यांचा पराभव झाला नसता, असे विधान केले. (Pankaja Munde News)

बीडच्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपने (Bjp) दोनवेळा खासदार असलेल्या प्रीतम मुंडे यांची उमेदवारी कापून त्यांच्या भगिनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसने शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली होती.

पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी भाजपच्या बड्या नेत्यांनी सभा घेतली होती. मात्र, मतदारांनी बजरंग सोनवणे यांना विजयी केले. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी जर भाजपऐवजी अपक्ष निवडणूक लढली असती तर त्यांचा विजय झाला असता असे वक्तव्य दीपक केदार यांनी केले आहे. केदार यांनी निवडणुकीनंतर केलेल्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा जोरात सुरु आहे.

जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

या लोकसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे येत्या काळात आम्ही जातीय सलोखा टिकवण्याची मागणी करत आहोत, असे दीपक केदार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

SCROLL FOR NEXT