गणेश पांडे
परभणी : राज्यात महायुतीला दोनशे पार तर एकट्या (Meghna Bordikar) भाजपला 132 जागा मिळाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात कोणाची वर्णी लागणार यावर सध्या चर्चा सुरू आहे. संभाव्य मंत्र्यांची नावे समोर येत असली तरी भाजपचे धक्कातंत्र पाहता या संभाव्य मधील कोण मंत्री होणार? हे मंत्रीमंडळ विस्ताराआधी निरोप आल्यावरच स्पष्ट होणार आहे. 'देवाभाऊं'च्या या नव्या मंत्रीमंडळात परभणीतून कोणाला संधी मिळते? याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
गेल्या अनेक दशकांपासून मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या (Parbhani) परभणी जिल्ह्याला यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळते का? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर आणि रासपचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या नावांची चर्चा सध्या होताना दिसते आहे. परभणी जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींना यापूर्वी मंत्रीपद मिळाले असले तरी विधीमंडळाच्या 75 वर्षाच्या कालावधीत बोटावर मोजन्या इतक्याच नेत्यांना ही संधी मिळाली होती.
त्यापैकी काही अल्पकालीन ठरले तर बहुतांश जणांना राज्यमंत्रीपदावरच समाधान मानावे लागले होते. महत्वाची खाती कधी परभणीच्या वाट्याला आली नाही. जिल्ह्यातील दिवंगत स. गो. नखाते, दिवंगत रावसाहेब जामकर, माणिकराव भांबळे, गणेशराव दुधगावकर, सुरेश वरपुडकर आणि फौजिया खान यांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी यापुर्वी मिळाली आहे. मात्र, त्यांच्या काळात जिल्ह्यात अपेक्षित विकास झाला नाही. त्यामुळे आता तरी परभणीला कॅबिनेट मंत्रीपद तेही पुर्ण पाच वर्षांसाठी मिळावे, अशी अपेक्षा परभणीकर बाळगून आहेत.
मंत्रीमंडळ विस्तारात जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळाल्यास, विकासाला चालना मिळेल, अशी आशा बोलून दाखवली जात याहे. निवडून आलेल्या महायुतीच्या आमदारांची संख्या पाहता भौगोलिक आणि सामाजिक समतोल राखत मंत्रीमंडळ तयार केले जाणार आहे. अशावेळी परभणीला मंत्रीपद मिळाले तर ते भाजपच्या खात्यात जाईल की मग घटक पक्षाला संधी दिली जाते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी, पायाभूत सुविधा, आणि रोजगाराच्या संधी या बाबतीत मंत्रीपद महत्त्वाचे ठरू शकते.
परिणामी, मेघना बोर्डीकर किंवा डॉ. रत्नाकर गुट्टे यापैकी एकाला मंत्रीपद मिळाल्यास परभणी जिल्ह्याला मोठी संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात या चर्चांना पूर्णविराम मिळणार असून, परभणीच्या राजकीय भविष्याला एक नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
मेघना बोर्डीकर जिंतूर विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेल्या आहेत. त्यांचा अनुभव आणि पक्षनिष्ठा हा त्यांचा मोठा आधार आहे. त्यांच्या बाजूने स्थानिक नेते, महिला सक्षमीकरण आणि भाजपच्या मतदारसंघीय संघटनात्मक कामाची ताकद आहे. तर रासपचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे हे ही गंगाखेडमधून सलग दोन वेळा निवडून आले आहेत. गुट्टे यांना स्थानिक पातळीवर प्रबळ समर्थन आहे. विकासकामांवर त्यांचा भर राहिला असून, महायुतीतील घटक पक्ष म्हणून रासपला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.