Maratha Reservation News Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation News : फोनची रिंग वाजताच राजकीय नेत्यांना भरते धडकी...

Prasad Shivaji Joshi

Marathwada Political News : मराठा आरक्षणाच्या मागणीने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. आंदोलक माघार घेण्यास तयार नाहीत, राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. (Maratha Reservation News) शिवाय दिसेल तिथे मंत्री, आमदार, खासदारांना काळे झेंडे दाखवून पिटाळले जात आहे. एवढेच नाही, तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातील लोकप्रतिनिधींना समर्थक फोन करून जाब विचारत आहेत.

या दरम्यान झालेले संभाषण समाजमाध्यमांवर व्हायरल करत आहेत. त्यामुळे नेत्यांच्या खिशातला फोन वाजला की त्यांना धडकी भरत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र आहे. (Marathwada) मराठा समाजाच्या आरक्षण मिळण्यासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला दिलेली चाळीस दिवसांची मुदत २४ ऑक्टोबर रोजी संपली. (Maharsahtra) आज दि. २५ ऑक्टोबरपासून मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे.

मराठा आरक्षण समर्थक वेगवगेळ्या माध्यमातून आरक्षणाची लढाई लढत आहेत. राज्यातील अनेक गावांत राजकीय नेत्यांना प्रवेश नाकारण्यात येत आहेत. (Maratha Reservation) जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांनी गावात प्रवेश करू नये, अशा मजकुराचे फलक गावोगावी लावले गेले आहेत. तसेच शहरात राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात आरक्षण समर्थकांची घोषणाबाजी होत आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेड जिल्ह्यात, तर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांना जालना जिल्ह्यातील कार्यक्रमात घोषणाबाजीचा सामना करावा लागला. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे मराठा आरक्षण समर्थकांनी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या वाहनांचा ताफा माजलगाव येथे अडवला होता. घोषणाबाजी, वाहनांचा ताफा अडवणे यानंतर मराठा आरक्षण समर्थक राजकीय नेत्यांना दूरध्वनीवर कॉल करून मराठा आरक्षणासंबंधी प्रश्न विचारत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम, राज्यातील मंत्री गुलाबराव पाटील, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांना मराठा आरक्षण समर्थकानी दूरध्वनीवर कॉल केले.

मराठा आरक्षणासंबंधी प्रश्न विचारले, राजीनाम्याची मागणीही केली, या प्रकारांमुळे राजकीय नेते चिडत आहेत. परिणामी अनेकदा संभाषणात असभ्य भाषेचा वापर केला जातो. विशेष म्हणजे हे संभाषण रेकाॅर्ड केले जात असून, ते समाजमाध्यमांवर व्हायरल केले जात आहे. या प्रकाराने राजकीय नेते वैतागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांनाही फोन केले जात आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील रमेश पाटील नावाचा तरुण, तर अशा काॅलसाठी राज्यभरात ओळखला जातो. गेल्या काही महिन्यांपासून रमेश पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या शेकडो नेत्यांना फोन करून त्यांचे संभाषण समाजमाध्यमांवर व्हायरल केले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT