pradnya satav Sarkarnama
मराठवाडा

Pradnya Satav join BJP news : हिंगोलीत काँग्रेसचा सफाया; प्रज्ञा सातव भाजपमध्ये सामील, 'या' एका कारणामुळे फिरली सर्व सूत्रं?

Pradnya Satav BJP joins reason : हिंगोलीत काँग्रेसमधील पक्षांतर्गत विरोधामुळे प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नेमकं काय आहे कारण? वाचा सविस्तर.

Jagdish Pansare

Hingoli BJP Congress politics : हिंगोली काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी विधान परिषदेतील आमदार प्रज्ञा सातव यांनी अखेर काँग्रेसची साथ सोडली. आज विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत प्रज्ञा सातव यांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश केला. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सातव आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपचे कमळ हाती घेतले.

प्रज्ञा सातव यांच्या या भाजपा प्रवेशामुळे हिंगोलीतून काँग्रेसचा सफाया झाला आहे. राजीव सातव यांच्या निधनानंतर हिंगोली काँग्रेसवरील कमांड प्रज्ञा सातव यांना कायम राखता आली नाही. सातव यांच्या अचानक निधनामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या या परिवारावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आभाळमाया दाखवत प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर बिनविरोध निवडून पाठवले.

शरद रणपिसे यांच्या रिक्त झालेल्या या जागेवर प्रज्ञा सातव यांना संधी दिल्यानंतर हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस अधिक भक्कम होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र सातव यांना पती राजीव सातव यांनी उभी केलेली कार्यकर्त्यांची फळी, संघटनेची ताकद टिकवता आली नाही. काँग्रेसच्या स्थानिक नेते तथा माजी आमदार भाऊसाहेब पाटील गोरेगावकर व इतरांशी प्रज्ञा सातव यांना जुळवून घेता आले नाही. त्यामुळे कळमनुरी आणि हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसमध्ये सातत्याने अंतर्गत गटबाजी सुरू होती.

काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रज्ञा सातव यांच्या मर्यादा लक्षात घेत पक्ष वाढीसाठी त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना बळ देणे सुरू केले. विशेषत: माजी आमदार भाऊसाहेब पाटील गोरेगावकर यांना झुकते माप देत काँग्रेसची ताकद हिंगोली शहर आणि जिल्ह्यामध्ये वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र यावरूनच प्रज्ञा सातव यांचे जिल्ह्यातील काँग्रेसचे इतर नेते आणि राज्य पातळीवरच्या नेत्यांची खटके उडू लागले.

नाना पटोले यांच्यावर प्रज्ञा सातव यांचा विशेष राग होता अशी ही माहिती सूत्रांनी दिली. सातव यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांना कळमनुरी आणि हिंगोली जिल्ह्यात कुठल्याच प्रकारची कामे मिळत नव्हती, याउलट प्रज्ञा सातव यांची पक्षांतर्गत विरोधक भाऊसाहेब पाटील गोरेगावकर यांना अधिक महत्त्व पटोले यांच्याकडून दिले जात होते, असा आरोपही समर्थकांकडून केला जात होता.

यासंदर्भात प्रज्ञा सातव यांनी राज्यातील इतर नेत्यांकडे तक्रारीही केल्या. परंतु त्याला दाद मिळत नसल्याने पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्याशीही प्रज्ञा सातव यांनी संपर्क साधून कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नसल्याचे बोलले जाते. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रज्ञा सातव यांनी अन्य पर्यायांचा शोध सुरू केला आणि तो भाजपमधील प्रवेशाने संपला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT