Ex.Cm Prithviraj Chavan News, Aurangabad
Ex.Cm Prithviraj Chavan News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Prithviraj Chavan News : बुलेट ट्रेनमुळे महाराष्ट्राच्या डोक्यावरचे कर्ज ४५ टक्क्यांनी वाढणार..

सरकारनामा ब्युरो

Congress : जागतिक स्तरावरील युनो संघटनेच्या अवहालानुसार येत्या १४ एप्रिलला भारत लोकसंख्येच्या बाबतीत जगातला एक नंबरचा देश बनेल. चीन दुसर्‍या स्थानावर फेकल्या जाईल. तथापि, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आपले दरडोई उत्पन्न मात्र दिवसेंदिवस घटत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithiviraj Chavan) यांनी केली.

बुलेट ट्रेन सारख्या अनावश्यक गोष्टींवर होणाऱ्या प्रचंड खर्चामुळे महाराष्ट्राच्या डोक्यावरील कर्जात ४५ टक्क्यांनी वाढ होणार असल्याचा दावा देखील चव्हाण यांनी केला. गुरुवारी (ता.बारा) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) सेवादलाच्या वतीने कुंभेफळ (ता. औरंगाबाद) (Aurangabad) येथे आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात चव्हाण बोलत होते. हे प्रशिक्षण शिबीर तीन दिवस चालणार आहे. शिबीराचे उद्घाटक, प्रमुख अतिथी आणि आजचे प्रमुख वक्ते म्हणून चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली.

चव्हाण म्हणाले, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो ही ऐतिहासिक पदयात्रा होत आहे. यासाठी राहुल गांधींचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या पदयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे नरेंद्र मोदींच्या विरोधातील जवळपास सर्व या पदयात्रेत सहभागी झाले. या पदयात्रेनंतर येत्या २६ जानेवारी पासुन पुढील दोन महिन्यांसाठी महाराष्ट्रात "हाथ से हाथ जोडो" हे अभियान राबविण्यात येणार आहे.

देशाची लोकशाही व घटना धोक्यात असुन तिला वाचविण्यासाठी नरेंद्र मोदींचा २०२४ च्या निवडणुकीत पराभव होणे गरजेचे आहे. भारताची अर्थव्यवस्था ढासळलेली असुन बोगसगिरीने ती फुगलेली दाखविण्याचा प्रयत्न होत असला तरी वास्तव भयानक आहे. आर्थिक विषमतेत दिवसेंदिवस मोठी तफावत निर्माण होत असुन कुपोषण, गरीबीच्या तुलनेत दरडोई उत्पन्न वाढत नसल्याचे चित्र आहे. सोबतच बेरोजगारी व महागाई भयानक वाढत आहे.

कर्ज काढुनही सरकार चालवायला पैसे नाहीत. मोदी सरकारच्या ८ वर्षाच्या कार्यकाळात पेट्रोल, डिझेल व गॅस अंतर्गत २८ लाख कोटी रुपये कर स्वरूपात गोळा करण्यात आले आहेत. याशिवाय सरकारी, निमसरकारी व सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न होत आहेत. यातुन ठराविक उद्योगपतींच्या घशात सरकारी मालमत्ता जात आहेत. नुसते रस्ते, दळणवळणाची इतर साधने उपलब्ध करून देताना उच्च शिक्षण, आरोग्य यासह इतर मुलभुत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रावर दोन टक्के खर्च आवश्यक असताना तो एक टक्क्याच्या आत आल्याची भयावह स्थिती आहे. ९३ जनता आजही असंघटित क्षेत्रात काम करते. यातील ५० अधिक शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे शेतीवरील ताण कमी करणे आवश्यक आहे. मात्र, या ऐवजी राज्यात येणारे मोठ-मोठे उद्योग दुसरीकडे पळविण्यात येत आहेत.

माझ्या मुख्यमंत्री काळातील अनेक महत्वाच्या योजना व प्रकल्पांना एक तर कात्री लावी गेली अथवा त्यांना इतरत्र हलविण्यात आल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. सद्यस्थितीतही राज्यातही दूरदृष्टी नसलेले नेतृत्व असुन शिक्षणाचा दर्जा खालावत आहे. अर्थव्यवस्थेचा विकास ज्या प्रमाणे होत आहे त्यानुसार शिक्षण क्षेत्रातुन बाहेर पडणार्‍या व्यक्तीच्या हाताला काम मिळण्याबाबत शंका आहे. त्यामुळे या सरकारसह केंद्रातील सरकार खाली खेचण्याची गरज असल्याचेही चव्हाण म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT