Ajit Pawar News Sarkarnama
मराठवाडा

Ajit Pawar News : एखाद्या प्रकल्पाचे नारळ फोडल्यानंतर त्याला चाळीस वर्ष लागतात, हे आमचं अपयशच! लेंडी प्रकल्प पूर्ण करणार

Ajit Pawar expresses his dissatisfaction over a development project being delayed for 40 years, calling it a clear administrative failure. : ज्यांनी आज पक्षात प्रवेश केला त्या सगळ्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संधी दिली जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.

Jagdish Pansare

Nanded News : ऐकोणचाळीस वर्षापुर्वी नांदेड जिल्ह्यातल्या लेंडी प्रकल्पाचा नारळ फोडण्यात आला होता. शंकरराव चव्हाण यांच्या काळात याचे भुमीपूजन झाले. परंतु तो अद्याप पूर्ण होऊ शकला नाही. दोन राज्यातील आंतरराज्य असलेला हा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे. एखाद्या प्रकल्पाच्या भुमीपूजनाचा नारळ फोडल्यानंतर तो पूर्ण व्हायला चाळीस वर्ष लागतात हे आमच अपयशचं म्हणावे लागेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. लवकरच लेंडी प्रकल्पातील अडथळे दूर करुन तो पूर्ण करु, असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी उपस्थिताना दिला.

मुखेड तालुक्यातील चव्हाण वाडी येथे शेषराव चव्हाण यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनी लेंडी प्रकल्पासह नांदेड जिल्ह्यातील मनार धरण, गोदावरी मन्यार साखर कारखाना व इतर रखडलेल्या प्रकल्पांना गती देऊन ते पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले. भाषणाच्या सुरवातीला अजित पवार यांनी महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढल्याचे नमूद केले. हे काम करणारं सरकारं आहे. फडणवीस, शिंदे आम्ही सगळे मिळून चांद्यापासून-बांधापर्यंत काम करतोय.

संकट येत असतात, आताही पाकिस्ताननं आपल्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला केला. आपण आॅपरेशन सिंदूरमधून त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. मी महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन करतो. मोदीजींनी राजकीय इच्छाशक्ती दाखवली आणि आपण पाकिस्तानला त्यांच्या भागात घुसून धडा शिकवला. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील सचिन वंजे हे वीर जवान नुकतेच काश्मीरमध्ये शहीद झाले, देगलुर तालुक्यातील ते रहिवासी होते. त्यांना मी अभिवादन करतो.

शासनाकडून त्यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपये, रमाई घरकुल योजनेतून घर देण्यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. वंजे यांच्या पत्नीला नोकरीसाठीही प्रयत्न करणार असल्याचे सांगत शहीद जवानांच्या कुटुंबाच्यापाठीशी सरकार सदैव खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. पक्षप्रवेश होतायेत, जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढते आहे. शेषराव चव्हाण यांना राजकारणात कोणतेही मोठे पद मिळाले नाही, पण ते कधी नाराज झाले नाही. त्यांना विधान परिषदेवर संधी मिळणार होती, पण सुधाकरराव नाईक यांचे अचानक निधन झाले आणि तो विषय मागे पडला. शेषराव चव्हाण यांच्या महाविद्यालयाला अनुदान मिळवून देऊ, मुंबईत गेल्यानंतर यात मार्ग काढू, असेही पवार यांनी सांगितले.

तुमच्यावर पश्चातापाची वेळ येणार नाही..

उदय चव्हाण हे शंकरराव चव्हाण यांचे नातू आहेत. त्यांनी पक्षात प्रवेश केला त्याचाही फायदा आपल्या पक्षवाढीसाठी होणार आहे. ज्यांनी आज पक्षात प्रवेश केला त्या सगळ्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संधी दिली जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. भास्कर पाटील खतगावकर, प्रतापराव या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. तिसऱ्यांदा त्यांनी मला नांदेड जिल्ह्यात बोलवले. ते पुन्हा यावे लागेल असे सांगत आहेत. मी परत येईन आणि जे जे इच्छुक आहेत त्यांचे पक्ष प्रवेश करून घेईल. पक्षात प्रत्येकाचा योग्य सन्मान राखला जाईल, तुम्हाला पश्चाताप होणार नाही.

जुन्यांचाही पक्षात योग्य मान राखला जाईल. जुन्या-नव्यांची सांगड घालून झपाटून काम करावे लागेल. मग यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. लेंडी प्रकल्पाचे 39 वर्षापुर्वी भुमीपूजन झाले. आता आपण या प्रकल्पाचे रखडलेले काम सुरू केले आहे. हे करत असताना अनेकांनी मला निवेदन दिले आहे. पुनर्वसनाचा प्रश्न व इतर जे काही मुलभूत प्रश्न आहेत ते सोडवले जातील. मी अर्थमंत्री आहे, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, विखे पाटील यांच्याशी बोलून तुम्हाला मदत करेल, काळजी करू नका. मनारसाठी याच महिन्यात बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल.

नारळ फोडल्यानंतर एखाद्या प्रकल्पाला चाळीस वर्ष लागतात हे आमचे अपयशच आहे. गोदावरी पुनर्भरण आणि मराठवाडा वाॅटर ग्रीडच्या माध्यमातून पाणी आणण्याची योजना आपण राबवतोय. 54 टीएमसी पाणी आणून 2 लाख 40 हजार हेक्टर भागाला याचा लाभ होईल, असेही अजित पवार यांनी सांगितले. लाडक्या बहि‍णींना जिल्हा बँकेच्या माध्यमातून 30-40 हजारांचे भागभांडवल उभे करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता आम्ही पंधराशे रुपये देतो ही योजना बंद होणार नाही. शेतकर्‍यांना वाऱ्यावर सोडणार नाही, हे राज्य सरकार कुठल्याही संकटात शेतकर्‍यांना एकटं सोडणार नाही, अशी ग्वाही देतो.

शेतकर्‍यांनी एआय या नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. या तंत्रज्ञानामुळे खत, पाणी, खर्च निम्याने कमी होतो आणि उत्पादन दीडपटीने वाढते. हे देशात महाराष्ट्रात सिद्ध झाले आहे. शेतकऱ्यांना आपण वीज बील माफ केलं आहे, पण हे पैसे आम्ही महावितरणला भरतो. वीस हजार कोटी भरावे लागतात. पण आता शेतकर्‍याला दिवसा वीज मिळणार, रात्री मोटार चालू करायला जावे लागणार नाही. सोलार पॅनलचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बॅरेजसचे प्रश्नही आपण सोडवले आहेत, ही ताकद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. आम्ही कामाची माणसं आहोत, बीनकामाची नाही, असेही अजित पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT