Pune Hit And Run Case Dr. Taware Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News: आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलणारे डॉक्टर पांढऱ्या कोटातील गँगस्टर की अतिरेकी?

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News: राज्यातील पाणी टंचाई, बियाणांचा तुटवडा, शेतकरी आत्महत्या, पुणे अपघात प्रकरणात आरोपीला वाचवण्यात सरकारी अधिकारी, डॉक्टरांचा सहभाग या मुद्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. पुणे 'हिट अँड रन' प्रकरणातील आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलणारे डॉक्टर हे पांढऱ्या कोटातील अतिरेकी, गँगस्टर आहेत का? असा संतप्त सवाल त्यांनी संभाजीनगरात पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.

यावेळी काही जुन्या प्रकरणांचा दाखला देत दानवे म्हणाले, किडनी रॅकेट प्रकरणात 2022 मध्ये वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी ससून प्रशासनाला पत्र पाठवून डॉ. अजय तावरे (Dr. Ajay Taware) यांना अधीक्षक पदावरून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. तरीही ते अवयव प्रत्यारोपण समितीमध्ये सक्रीय होते. 2023 मध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि वैद्यकीय सचिव अश्विनी जोशी यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक यांच्या 16 जणांच्या बदलीची फाईल काढली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ती फाईल मान्यतेसाठी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवली. मात्र यातील 15 जणांच्या बदल्या झाल्या. मात्र, डॉ. तावरे यांची बदली का झाली नाही? तावरे यांची बदली कोणी रोखली आणि त्यांना कोणाचं संरक्षण आहे, असा सवाल अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी उपस्थित केला. ससून रुग्णालयातील ड्रग्ज माफिया ललित पाटील याचे प्रकरण गाजले असताना पुणे अपघातातील आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याची हिंमत येथील डॉक्टरांना कशी झाली? पांढरा कोट घातलेले हे अतिरेकी आहेत की गँगस्टर? पुणे अपघातप्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांची भूमिका देखील संशयास्पद असल्याचे दानवे म्हणाले.

शेतकऱ्यांच्या (Farmer) आत्महत्येसंदर्भात दानवे यांनी संभाजीनगर येथील पिंपळखुटा गावातील विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याने सिबिलस्कोअर अभावी कर्ज न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्याचे सांगितले. या प्रकरणात बँक मॅनेजरवर तत्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्ज देतांना सिबिल पाहू नये, असे स्पष्ट आदेश दिलेले असताना बँका त्याला जुमानत नाही हे यावरून स्पष्ट झाले आहे. मराठवाडयात (Marathwada) गेल्या पाच महिन्यांत 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याकडे दानवे यांनी लक्ष वेधले.

सिबिलशिवाय शेतकऱ्यांना कर्ज मिळेल आणि न मिळाल्यास गुन्हा दाखल करू, अशी घोषणा करणाऱ्या सरकारने सिबिलअभावी कर्ज न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आत्महत्या करूनही एकही गुन्हा दाखल केला नाही. राज्यात बी बियाणांचा तुटवडा भासत असून खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी हा तुटवडा निर्माण केला तर नाही ना? अशी शंका दानवे यांनी उपस्थित केली. मुख्यमंत्री टँकर लावण्यासाठी मराठवाड्यात पाणी टंचाई बैठक घेण्यासाठी आले होते का? राज्यातील पाण्याची टंचाई पाहता युती सरकारने आणलेली जलयुक्त शिवार 2.0 योजना फोल ठरल्याचे चित्र असल्याची टीका दानवे यांनी केली. गेल कंपनी परराज्यात जाण्याला सरकारच धोरण कारणीभूत आहे, असा आरोपही दानवेंनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT